इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील सर्वच कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचे असतात. त्यामुळेच ते लोकप्रिय असतात. त्यातही रिऍलिटी शोजना प्रेक्षकांची जास्त पसंती असते. त्यातही ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम किंचित अधिकच लाडका आहे. सध्या मराठी ‘बिग बॉस’चे चौथे पर्व सुरू आहे. यात दररोज काही ना काही घडत असतं. आणि प्रेक्षकांना त्याची प्रचंड उत्सुकता असते.
‘बिग बॉस मराठी सिझन ४’ची शेवटची चावडी नुकतीच पार पडली. बरेच ट्विस्ट असलेला हा सिझन पाहताना प्रेक्षकांना देखील मजा आली. याशिवाय अनेक लोकप्रिय कलाकार यात सहभागी झाले होते. राडे, भांडण, खेळ, प्रेम, भावना या सगळ्यामुळे हा सिझन उत्कंठा वाढवणारा ठरला. यावेळचा सिझन हा ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित होता. मात्र आता प्रेक्षकांवर ‘ऑल इज नॉट वेल’ म्हणण्याची वेळ प्रेक्षकांवर आली आहे. नुकत्याच झालेल्या या शो च्या शेवटच्या चावडीमध्ये प्रसाद जवादे घराबाहेर पडला आहे. हा माझ्यासाठी मोठा झटका असल्याचे कार्यक्रमाचे होस्ट महेश मांजरेकर यांनी स्वतः सांगितले तर प्रेक्षक देखील यावर नाराज झाले आहेत.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. लवकरच या पर्वाचा विजेता घोषित केला जाणार आहे. सध्या ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य उरले आहेत. नुकतेच या सदस्यांमध्ये एलिमिनेशन झाले. यात बॉटम ३ मध्ये राखी, अमृता आणि प्रसाद हे स्पर्धक होते. त्यातून रविवारी प्रसाद जवादेची एक्झिट झाली.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1609927537748246529?s=20&t=Wdw1PryQMqUoY5RFvq20Wg
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासून प्रसाद याचे घरात वाद सुरू आहेत. थोडासा गोंधळलेला पण मैत्री, प्रेम, काळजी आणि माणूस म्हणून प्रसादने प्रेक्षकांसह घरातील सदस्यांचे देखील मन जिंकले होते. नुकत्याच झालेल्या धान्याच्या कार्यात अपूर्वा नेमळेकरला ‘तिकीट टू फिनाले’ प्रसादमुळे मिळाले होते. प्रसादने पहिल्या दिवसापासूनच त्याच्या खेळाने आणि घरातील त्याच्या वागणुकीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तो आता स्पर्धेतून बाहेर गेल्याने सर्वच स्पर्धकांना दुःख झालं. आपल्याला घराबाहेर पडावं लागतंय ते ऐकून प्रसादचेही डोळे पाणावले. सगळ्या स्पर्धकांनी भावूक होत प्रसादला निरोप दिला. तर घराबाहेर जाताना प्रसादने सर्व स्पर्धकांची माफी मागून “आपली जी भांडणं आहेत ती आपण या घरापुरतीच ठेवूया,” असं म्हणाला.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1609916163429142528?s=20&t=Wdw1PryQMqUoY5RFvq20Wg
आता या स्पर्धेचा शेवटचा आठवडा शिल्लक आहे. पुढील आठवड्यात त्याचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या आठवड्याच्या मध्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. नुकतंच अपूर्वाला ‘तिकिट टू फिनाले’ मिळाल्याने बिग बॉस ४ची फायनलिस्ट म्हणून तिचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर, आरोह वेलणकर यांच्यात रंगलेली चुरस पाहायला मिळणार आहे. प्रसाद बाहेर पडल्याने प्रेक्षकांनी सोशल मीडियावर ‘ऑल इज नॉट वेल’ म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.
Reality Show Big Boss MarathiS4 Grand Finale
Colors Marathi TV Entertainment