इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात शुक्रवारी दिव्यांगजनांची प्रतिभा, कर्तृत्व आणि आकांक्षांचा गौरव करणारा, ‘पर्पल फेस्ट’ हा एक दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या महोत्सवाला भेट दिली आणि दिव्यांगजनांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, वंचित घटकांप्रति असलेली संवेदनशीलता देशाची किंवा समाजाची प्रतिष्ठा ठरवते. करुणा, सर्वसमावेशकता आणि एकता ही आपल्या संस्कृतीची मूल्ये आहेत. आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सामाजिक न्याय, समान अस्तित्व आणि व्यक्तीची प्रतिष्ठा याविषयी सांगितले आहे, असे त्या म्हणाल्या.
सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगजनांचे सक्षमीकरण आणि समान सहभाग सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. महोत्सवाला भेट देणाऱ्यांसाठी क्रीडा, डिजिटल समावेशन आणि उद्योजकतेवरील कार्यशाळा, अबिलिम्पिक, सृजनात्मक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे आयोजित ‘पर्पल फेस्ट’, विविध प्रकारचे अपंगत्व आणि लोकांच्या जीवनावर होणाऱ्या त्याच्या परिणामांविषयी जनजागृती करणे आणि समाजात दिव्यांग व्यक्तींचा स्वीकार आणि समावेश याबद्दल समज वाढवणे, हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.