मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या वाढत असल्याने बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (बीसीसीआय)ने रणजी ट्रॉफी स्पर्धा पुढे ढकलल्या होत्या. आता मात्र संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने या मॅचेसचे सुधारित वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. १६ फेब्रुवारीपासून या मॅचेसला सुरूवात होणार असून ५ मार्चपर्यंत या मॅचेस होणार आहेत. बीसीसीआयने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या नुकतीच सुधारित कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या स्पर्धांचे नियोजन १३ जानेवारीपासून करण्यात आले होते. परंतु, ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे देशभरातच संसर्गाचा धोका पुन्हा वाढला होता. त्यामुळे या मॅचेस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हा धोका काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारीपासून मॅचेसला सुरूवात होणार आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत १८ संघ सहभागी होणार आहे. आठ शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्रिवेंद्रम, कटक, हैदराबाद, राजकोट, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद आणि गुवाहाटी या आठ शहरांचा यात समावेश आहे. यावेळी बीसीसीआयने स्पर्धेच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. चार संघ यावेळी असणार असून त्यांचे आठ ग्रुप बनवण्यात आले आहे. तसेच प्लेट गटात सहा संघ असतील. ही स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. गेल्या सिझनमध्ये रणजी स्पर्धा रद्द झाल्याने क्रिकेटपटूंना नुकसान भरपाईदेखील देण्यात आली होती. सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक अशी ही रणजी स्पर्धा आहे. १९३४ सालापासून तिचे आयोजन केले जाते. क्रिकेटपटू रणजितसिंह यांच्या नावावरून या स्पर्धेला रणजी नाव देण्यात आले आहे.