इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -१९)
श्रीराम वन गमन मार्ग -१९
लंकेकड़े कूच करण्यापूर्वी श्रीराम येथे चार महिने राहिले
||स्फटिक शिला-माल्यवंत पहाड||
प्राचीन किष्किंधा नगरी पासून ७ किमी. अंतरावर रामायण कालीन एक महत्वाचे ठिकाण आहे. या स्थानाचे महत्त्व असे की लंकेकडे वानरसेनेसह कूच करण्यापूर्वी श्रीराम आणि लक्ष्मण पावसाळ्यातील चार महिने या ठिकाणी गुहेत राहिले होते. या स्थानाचे नाव आहे. माल्यवंत रघुनाथ मंदिर. माल्यवंत पहाडावरील स्फटिक शीला नावाच्या खडकावर असलेल्या गुहेत हे स्थान आहे. पावसाळ्यातील चार्तुमास संपल्या नंतर श्रीराम व लक्ष्मण यांनी वानर सेने सह लंकेकडे कूच केले.
हंपी पासून ७ किमी आणि कमलापूर गावा पासून 3 किमी अंतरावर प्राचीन माल्यवंत रघुनाथ मंदिर आहे. एका उंच पहाडावर हे मंदिर आहे. आपल्या खाजगी वाहनांनी पहाडावर मंदिरा पर्यंत जाता येते. स्फटिक शिला नावाने प्रसिद्ध असलेल्या या पहाडावर एक भव्य मंदिर आहे. विजयनगर साम्राज्याच्या शासकांनीच हे मंदिर निर्माण केले आहे.
मंदिराच्या चारी बाजूंनी एखाद्या किल्ल्या सारखी भक्कम तटबंदी असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन भव्य प्रवेशव्दारं आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिरात रात्रंदिवस, चोवीस तास सदैव रामायणाचा पाठ केला जातो.
मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार पूर्वाभिमुख असून बहुतेक सर्वच भाविक व पर्यटक याच प्रवेशव्दारातून मंदिरात प्रवेश करतात. हंपी येथील विजयनगर कालीन इतर सर्व मंदिरां प्रमाणे या मंदिराचे प्रवेशव्दार, भिंती व खांबांवर अतिशय कलात्मक कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. सोळाव्या शतकात माल्यवंत नावाच्या पहाडावर श्रीरामच्या या मंदिराची निर्मिती करण्यात आली त्यामुळे या मंदिराला ‘माल्यवंत रघुनाथ मंदिर’ असे म्हणतातः
या मंदिराची निर्मिती वास्तुशास्त्रानुसार् करण्यात आली असून मंदिराचा विस्तार अनेक एकर जागेवर आहे. मंदिरा समोरच्या दंगडी सभागृहात रामायणाचा अखंड पाठ करणारे बसतात. मंदिरात प्रवेश करताच रामायणाचा पाठ कानावर पडतो. अनेक वर्षांपासून चोवीस तास हा रामायण पाठ् अखंड सुरू आहे. हे या मंदिराचे वैशिष्ट्ये मानले जाते. रामायण पाठाचे वाचक दर एका तासाने बदलतात परंतु रामायणाचा पाठ अखंड सुरू असतो. रात्रंदिवस चालणारा हा अखंड रामायण पाठ पाहून अमृतसरच्या सुवर्णमंदिराची आठवण येते. येथेही गुरुवाणीचे अखंड पठण सुरु असते.
तीन प्रवेशद्वार ओलांडून मंदिरात प्रवेश केला जातो. या ठिकाणी उंच चौथर्यावर श्रीराम दरबार सजलेला आहे दरबारात श्रीराम, सीता व लक्ष्मण बसलेले असून त्यांच्या बाजूला हनुमान, सुग्रीव, जांबुवंत तसेच अनेक ऋषीमुनी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराचा कळस एका विशाल दगडावर रचलेला आहे . मोठ्या दगडा खालीच मंदिराचे गर्भगृह आहे. मंदिराच्या दक्षिणेला अनेक खांबांचे भव्य सभागृह आहे. हंपीच्या विठ्ठल मंदिरा सारखे हे दगडी सभागृह आहे, मंदिर परिसरातील पश्चिम दरवाजातून स्फटिक शिळेकडे जाता येते.
मंदिराच्या मागे अवाढव्य स्फटिक शिळेवर एक मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे एक मोठी गुफा आहे. याच ठिकाणी पावसाळयातील चार महिने श्रीराम व लक्ष्मण राहिले होते. मंदिरात एक शिवलिंग आणि भगवान शंकराचा मोठा फोटो तसेच राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या दगडावर कोरलेल्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या जवळ एका मोठ्या खडकाला एक उभी फट किंवा घळ पडलेली आहे आणि या फटीच्या बाजूला २७ छोटी छोटी शिवलिंगे आणि नंदी कोरलेले आहेत. याच पहाडाला स्फटिक शिला असे म्हणतात. श्रीराम येथे राहत असतांना नित्य शिवपूजा करीत असत. लक्ष्मण यांनी बाण मारून या पहाडावर ही घळ निर्माण करून पाणी काढले म्हणून या घळीला ‘लक्ष्मण तीर्थ’ असे म्हणतात.
या ठिकाणी परिसरांत अलौकिक शांततेचा अनुभव येतो.साक्षांत भगवान श्रीराम याठिकाणी चार महीने राहिले हा विचारच मन भारावून टाकतो. येथे राम नामाचा जप करीत अनेक तासही कुणी बसू शकतं.
माल्यवंत रघुनाथ मंदिराच्या पश्चिम दरवाजाने मागच्या बाजूला गेल्यावर अनेक दगडी वास्तू दिसतात यात हनुमान मंदिर प्रमुख आहे.
हंपी परिसरांत एकूण 1500 मंदिरे आहेत, यातील 380 मंदिर एकटया हनुमानाची आहेत असे सांगितले जाते. हे मंदिर देखील एक गुफाच आहे. येथील गर्भगृहातील भिंतीवर पाच ते सहा फुट उंच हनुमान मूर्ती कोरलेली आहे. ही हनुमान मूर्ती शेंदूरचर्चित आहे.
विजयनगर साम्राज्याच्या सुवर्ण कालखंडात या परिसरांत खूप मोठी व्यापारी पेठ असावी पण आज येथे अवशेष पहायला मिळतात. पहाडाच्या उंच शिखरावर एक दुमजली वास्तू आहे तिचेही आता खंडहर मध्ये रूपांतर झालेय. मात्र या दुमजली वास्तू वरुन माल्यवंत् रघुनाथ मंदिराचे विहंगम दृश्य दिसते.तसेच हंपी आणि किष्किंधा नगरीचा अनेक किमी पसरलेला प्रदेश नजरेत पडतो. गर्भागृहाच्या दारावर जय विजय यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात यावरून हे विष्णु मंदिर असावे असे वाटते पण या मंदिरात देवाची मूर्तीच नाहीये.
माल्यवंत पहाडावर असलेल्या स्फटिक शिलेवरील गुहेत पावसाळयाचे चार महिने काढल्यावर श्रीराम लंके कड़े निघाले.
माता सीतेची रावणाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी भगवान श्रीरामाने वानराना संघटित केले. यासाठी त्यांनी एका विशाल सेनेचे गठन केले.या सेनेत वानर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. श्रीरामानी वानराची ही सेना एकत्र केली. माता सीतेला अहंकारी रावणाच्या हातून सोडविण्यासाठी या युद्धात वानर सेनेने महत्वाचे योगदान दिले होते. लंके पर्यंत जाण्यापासून रावणाचा पराभव करण्यात वानर सेनेने महत्वाची भूमिका निभावली. वानरानीच लंके पर्यंत जाण्यासाठी रामसेतू पुलाची निर्मिती केली. भगवान श्रीराम आणि लंकापती रावण यांच्यातील युद्धात असंख्य वानराना वीरगती प्राप्त झाली. आपल्या या अदभुत योगदाना मुळेच हिंदू धर्मात वानराना पूजनीय मानलं जातं.
हजारो वर्षानंतर आजच्या आधुनिक युगांत संशोधन करणारे विद्वान रामायणातील एकेका गोष्टीची शहनिशी करीत आहेत. त्यांनी अशा एका ठिकानाचा शोध लावला आहे जेथे भगवान श्रीरामाने रावणाच्या लंकेवर स्वारी करण्यासाठी वानर सेना एकत्र केली होती.त्याठिकाणाचं नाव आहे-कोडीकरई.माल्यवंत पहाडापासून कोडीकराई हे ८६१ किमी अंतरावर आहे. श्रीरामाच्या वानर सेनेने हे अंतर पार केले आहे.
हनुमान आणि सुग्रीव यांची भेट झाल्यानंतर श्रीरामाने वालीचा वध करुन वालीने बळजबरीने बळकावलेले राज्य सुग्रीवाला परत मिळवून दिले. त्यानंतर भगवान श्रीरामाने ऋष्यमूक पर्वतावर सर्व वानराना बोलावले. याच ठिकाणी श्रीरामाने सीतेच्या शोधासाठी मार्गदर्शन केले. यानंतर सर्व वानरसेना माता सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेच्या दिशेने निघाली. पुढे गेल्यानंतर सर्व वानर एका विशिष्ट ठिकाणी जमा झाले. त्या जागेचे नाव होते-कोडीकरई! हेच ते ठिकाण जेथे भगवान श्रीरामाने वानर सेनेचे संगठन केले होते.
तामिळनाडूला लांबच लांब समुद्र किनारा लाभला आहे. याची लांबी सुमारे १००० किमी आहे.वेलांकनी समुद्र तटावर कोडीकरई वसलेले आहे. हे ठिकाण दक्षिणेला पाल्क स्ट्रेट आणि पूर्वेला बंगालच्या खाडीने घेरलेले आहे. कोडीकरई येथे भगवान श्रीरामाने वानर सेना एकत्र केली. येथेच त्यांनी माता सीतेच्या सुटके साठी योजना तयार केली आणि वानर सेनेकडून हे कार्य करून घेण्यासाठी कामाचे विभाजन केले होते.
कोडीकरई
हनुमान आणि सुग्रीवला भेटल्यानंतर श्रीरामांनी सेना जमवली आणि त्यांनी लंकेकडे प्रस्थान केले. मलय पर्वत, चंदन वन, अनेक नद्या , धबधबे आणि वने पार केल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेने समुद्राकडे प्रस्थान केले. श्रीरामांनी त्यांच्या सेनेला कोडीकरई येथे एकत्रित केले. तामिळनाडू राज्याला सुमारे १००० किमी पेक्षा मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. कोडीकरई हे ठिकाण वेलंकनीच्या दक्षिणेला आहे. ह्या गावाच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला पाल्क स्ट्रीट आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर श्रीराम व त्यांच्या सेनेच्या असे लक्षात आले की ह्या ठिकाणहून समुद्र ओलांडून जाणे शक्य नाही आणि येथे पूल सुद्धा बांधला जाऊ शकत नाही म्हणूनच श्रीराम त्यांच्या सेनेसह रामेश्वरमला गेले. रामेश्वरमला समुद्र शांत आहे. म्हणूनच येथे पूल बांधणे किंवा इथून समुद्र ओलांडणे सोपे होते.
कसे जावे-
माल्यवंत पहाड, या पहाडा वरील माल्यवंत रघुनाथ मंदिर आणि जेथे श्रीराम चार महिने राहिले त्या स्फटिक शिलेवरील गुहा हंपी पासून ७ किमी. आणि कमलापुर गावापासून ३ किमी अंतरावर आहे.
Ramayan Yatra part19 Malyavant Hill Raghunath Temple by Vijay Golesar
– विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७