मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा खासदार छत्रपती संभाजीराजे हे अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहेत. संभाजीराजे यांनी स्वराज्य नावाची नवी संघटना स्थापन करण्याचे म्हटले आहे. तसेच, संपूर्ण राज्याचा दौरा करण्याचेही त्यांनी घोषित केले आहे. होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा भाजप यांची त्यांनी मदत मिळणार का, ते अपक्ष म्हणून निवडून येण्यासाठी किती मत आवश्यक आहेत, आदी बाबी आता आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख ३१ मे आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला . महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल,डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२२ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी १० जून २०२२ ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकांसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १ जून रोजी अर्जांची छाननी होणार. ३ जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. १३ जून २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.
असं आहे जागांचं गणित
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रत्येकी १ उमेदवार देतील. विजयी उमेदवाराला ४१ मते आवश्यक आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी होतील. त्यानंतरही या तिन्ही पक्षांचे एकत्रित म्हणजेच महाविकास आघाडीकडे २७ मते शिल्लक राहतील. तर, भारतीय जनता पक्षाकडील संख्याबळ लक्षात घेता त्यांचे २ उमेदवार सहजच निवडून येतील. त्यानंतरही भाजपकडे २२ मते शिल्लक राहतील. म्हणजेच छत्रपती संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून विजय प्राप्त करायचा असेल तर त्यांना भाजप आणि महाविकास आघाडी यांनी त्यांच्याकडील अधिकची मते दिली तरच ते शक्य आहे.