नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोलापूरचे प्रख्यात हातमाग कारागीर राजेंद्र सुदर्शन अंकम यांना हातमाग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘ संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
११ व्या राष्ट्रीय हाथकरघा दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९६२ मध्ये सोलापूर येथे जन्मलेले राजेंद्र अंकम गेल्या ४८ वर्षांपासून पारंपारिक विणकरच्या रूपात हातमाग कला जोपासत आहेत. त्यांनी आपल्या वडिलांकडून विणकामाचे कौशल्य आत्मसात करून, १०० विणकारांना प्रशिक्षण देऊन या कलेला नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या कार्याने सोलापूरच्या हातमाग उद्योगाला नवे आयाम मिळाले असून, नवीन पिढीला प्रेरणा मिळाली आहे.
हा कार्यक्रम स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ आणि हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येतो. यावेळी २४ उत्कृष्ट कारागिरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले., यामध्ये ६ महिला आणि १ दिव्यांग कारागीरांचा समावेश आहे. त्यांच्या हातमाग क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले. कार्यक्रमात परराष्ट्र व्यवहार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री. पबित्र मार्गेरिटा, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनिया, खासदार कंगना रनौत, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव, अतिरिक्त सचिव (वस्त्रोद्योग) रोहित कंसल, हाथकरघा आयुक्त डॉ. एम. बीना, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी हातमाग क्षेत्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मिती क्षेत्र असल्याचे सांगितले . तसेच, डिझायनर्स आणि विणकारांनी एकत्र येऊन तरुणांना आकर्षित करणारी आधुनिक हातमाग उत्पादने तयार करण्याचे आवाहन केले. यावेळी हातमाग प्रदर्शन, ‘वस्त्र वेदा’ फॅशन शो आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ( NIFT) मुंबईच्या कॉफी टेबल बुकचे अनावरणही करण्यात आले.