मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे, आणि २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात अली आहे.
या आठवड्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान ३० सप्टेंबर पर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपार नंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपार नंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.