जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांच्या जीवाची काळजी घ्यावी म्हणून अनेक नियम केले आहेत. विशेषतः नागरिकांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. तरीही काही नागरिक निष्काळजीपणाने रेल्वे रूळ ओलांडतात आणि अपघातात आपला जीव गमावतात. अशाच प्रकारची घटना जळगाव शहरात घडली असून एका तरुणीला यात जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे या तरुणीने आपल्या कानात हेडफोन घातल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जळगाव शहरातील काळे नगर भागात राहत असलेली स्नेहल उजेनकर ( वय २० ) ही तरुणी एका खासगी दुकानात कामाला होती. काम आटोपून घरी जात असताना ती नेहमीच कानात हेडफोन घालून घराकडे जात असे. घराकडे जात असताना शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडताना त्या ठिकाणी असलेला अंधार आणि कानात असलेल्या हेडफोनमुळे तिला समोरुन येणाऱ्या रेल्वेचा आवाज आला नाही. रेल्वे रुळ ओलांडत असताना सुरत-भुसावळ पॅसेंजरची तिला जोरदार धडक बसून ती लांब फेकली गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.
या तरुणीच्या कानात हेडफोन असल्याचे मृत्यूनंतर आढळून आले. त्यामुळेच तिला रेल्वेचा अंदाज आला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, स्नेहल हिचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. परंतु तिचा रेल्वेच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगावसह अनेक शहरात रेल्वे प्रशासनातर्फे फूट ओव्हर ब्रिज विविध ठिकाणी बांधण्यात आले आहेत मात्र तरीही अनेकदा नागरिक या फूट ओव्हर ब्रिजचा वापर न करता वेळ वाचवण्यासाठी थेट रुळ ओलांडून पलिकडे पोहोचतात. पण याच दरम्यान अपघात होतो आणि प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात येते या शिवाय रेल्वे प्रशासनातर्फे जनजागृती सुद्धा करण्यात येते. मात्र, तरीही प्रवासी आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळ ओलांडतात आणि काही वेळा अपघात घडून नागरिक मृत्युमुखी पडतात.