नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिवाळी आणि छट पूजा उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वेने १२ हजाराहून अधिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, खासदार डॉ. संजय जयस्वाल, केंद्रीय मंत्री ललन सिंह आणि खासदार संजय कुमार झा यांच्याशी चर्चा केल्यानंतर, आगामी दिवाळी आणि छठ सणांसाठी विशेष व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल भवन येथे पत्रकारांना संबोधित करताना दिली. प्रवाशांना त्यांच्या परतीच्या प्रवासातही सुविधा मिळाव्यात यावर त्यांनी भर दिला.
वरिष्ठ लोकप्रतिनिधींशी सल्लामसलत केल्यानंतर, दिवाळी आणि छठ पूजेसाठी १२ हजाराहून अधिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच वेळी, प्रवाशांना परतीच्या प्रवासात देखील कोणतीही अडचण येऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल, असे मंत्री म्हणाले.
१३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान जायचा प्रवास करणाऱ्या आणि १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परतीच्या तिकिटांवर २० टक्के सूट दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाची अंमलबजावणी यंदाच्या उत्सवाच्या काळात केली जाईल आणि याचा फायदा मोठ्या संख्येने प्रवाशांना होईल.
याव्यतिरिक्त, गया ते दिल्ली, सहरसा ते अमृतसर, छपरा ते दिल्ली आणि मुझफ्फरपूर ते हैदराबाद अशा चार नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या जातील. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांना सेवा देणारी भगवान बुद्धांशी संबंधित महत्त्वाच्या स्थळांना भेट देणारी एक नवीन सर्किट ट्रेन देखील सुरू केली जाईल, अशी घोषणा मंत्र्यांनी केली.