इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या संदर्भात केलेले दावे निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. राज्याच्या मतदार यादीसंदर्भात त्यांनी केलेले आरोप कायद्याचा अवमान करणारे असल्याचंही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. राहुल गांधी यांनी राज्यातल्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात लिहिलेला लेख विविध वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झाला आहे. त्यावर निवडणूक आयोगानं ही प्रतिक्रिया दिली आहे.
मतदारांकडून अपेक्षित कौल नाही मिळाला, म्हणून निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप करणं हास्यास्पद आहे. काँग्रेसनं केलेल्या आरोपांवर २४ डिसेंबर रोजीच आयोगानं सर्व तथ्यांसह प्रत्युत्तर दिलं आहे आणि ते आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. वारंवार असे आरोप करताना तथ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातंय. देशातल्या सर्व निवडणुका सर्व कायद्यांचं पालन करुन घेतल्या जातात आणि जगभरात त्याचं कौतुक होतं, असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय.
निवडणुकांच्या संदर्भात चुकीची माहिती पसरवल्यानं कायद्याचा तर अवमान होतोच पण काँग्रेस पक्षानं नेमलेल्या पोलिंग एजंटचाही अवमान असल्याचा दावा निवडणूक आयोगानं केलाय. काटेकोरपणे आणि पारदर्शकरित्या निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी काम केलेल्या लाखो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर यामुळं विपरीत परिणाम होत असल्याचं मत आयोगानं मांडलंय.