पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विकृती कुठल्या टोकाला जाईल, हे कधीच सांगता येत नाही. पुण्यातील एका ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने विकृतीची परिसिमा ओलांडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दिराने वहिनी आणि तिच्या दोन लहान मुलांचा निर्घुण खून केला आणि त्यानंतर त्यांना जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात पिसोळी येथे ही घटना घडली. वैभव वाघमारे याने त्याची वहिनी आम्रपाली वाघमारे आणि तिची सहा वर्षांची मुलगी व चार वर्षांचा मुलगा यांचा खून केला. त्यानंतर त्यांचे मृतदेह जाळून टाकले. हे तिहेरी हत्याकांड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले. वैभव आणि आम्रपाली यांच्यात प्रेमसंबंध होते. ते दोघेही पुण्याबाहेरील रहिवासी. पण दीर आणि वहिनी यांच्यातील प्रेमसंबंधांना मान्यता मिळणार नाही, हे माहिती असल्यामुळे काही महिन्यांपूर्वी दोघेही घरदार सोडून पुण्यात पळून आले.
आम्रपाली तिच्या दोन्ही मुलांनाही सोबत घेऊन आली. चौघेही पिसोळी भागात एका घरात राहायचे. पण गेल्या काही दिवसांपासून वैभव सातत्याने आम्रपालीवर संशय घेत होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेत तो सतत तिच्याशी भांडत असे. दोघांमध्ये बुधवारी रात्री असेच भांडण झाले. आणि बघता बघता हे भांडण विकोपाला गेले. त्यातून राग अनावर झाल्याने वैभवने आम्रपाली आणि तिच्या मुलांचा खून केला. या घटनेने समाजमन हेलावून सोडले आहे.
गळा दाबून मारले
भांडण विकोपाला गेल्यावर वैभवने आम्रपालीचा गळा दाबून तिला मारून टाकले. हा संपूर्ण प्रकार दोन्ही लहान मुलांसमोर घडला त्यामुळे ते जोरजोराने रडत होते. त्यांच्या रडण्याचा आवाज शेजाऱ्यांना जाईल, या भीतीने वैभवने मुलांचाही खून केला. त्यानंतर त्याने त्यांचे मृतदेह घरातच जाळून टाकले आणि तिथून पसार झाला.
आरोपीला अटक
कोंढवा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि काही तासांमध्येच वैभव वाघमारे याला अटक केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Pune Crime Triple Murder in Family