– भारत प्रतिभूती आणि चलार्थ पत्र मुद्रणालय या दोन्ही प्रेस १५ ते ३० एप्रिल या कालावधीत बंद
– १ मे रोजी महाराष्ट्र दिन तर २ मे रोजी रविवार असल्यामुळे सुट्टी
नाशिकरोड – राज्यात जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. हे लक्षात घेऊन आणि सरकारची मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन येथील दोन्ही प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रेस प्रशासनाने घेतला. सरकारच्या ब्रेक द चेन मोहिमेतंर्गत भारत प्रतिभूती आणि चलार्थ पत्र मुद्रणालय या दोन्ही प्रेस १५ ते ३० एप्रिल या कालावधीत बंद राहणार आहेत.
भारत प्रतिभूती मुद्रणालयात सरकारी बॅंकांचे धनादेश, सरकारी मुद्रांक, पारपत्र, एक्साईज सील, टपाल तिकीटे छापली जातात. नोटांच्या प्रेस प्रेसमध्ये दहापासून पाचशे रुपयापर्यंतच्या नोटांची छपाई होते. वीस, पन्नास, शंभर व पाचशेच्या नोटा सध्या छापून तयार आहेत. रिझर्व्ह बॅंकेने नवीन नोटांसाठी सूचना केली तर ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. आयएसपी प्रेसमध्ये परराज्यांचे एक्साईज सीलचे काम सुरु आहे. ते या सुटीच्या कालावधीत पूर्ण केले जाईल.
राज्य सरकारने राज्यात जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. हे लक्षात घेऊन आणि सरकारची मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तथापी, औद्योगिक सुरक्षा दल, अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवा, वाहतूक, वीजगृहे, वीज व पाणी पुरवठा आदी आणीबाणीच्या सेवा या काळात सुरुच राहणार आहेत. प्रशासनाने तातडीच्या कामासाठी पाचारण केल्यास अधिकारी व कामगारांना हजर राहावे लागणार आहे. बंदच्या काळात कर्मचा-यांनी घरीच राहून करोनाला प्रतिबंधासाठी सरकारला सहकार्य करावे, करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिन तर २ मे रोजी रविवार आहे. त्यामुळे एकूण १७ दिवस प्रेसचे कामकाज बंद राहील. अत्यावश्यक सेवा मात्र, सुरु राहतील. प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या लॉकडाउनमध्ये २२ मार्चपासून ७७ दिवस दोन्ही प्रेस बंद होत्या. आठ जूनपासून त्या टप्प्याने टप्प्याने सुरु झाल्या. अनेक प्रेस कामगार करोनाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.