इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये आषाढी वारी बद्दल कौतुकोद्गार काढले. ते काय म्हणाले ते पाहूया पुढीलप्रमाणे…
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या उपनिषदांमध्ये एक जीवन मंत्र दिलेला आहे – चरैवेति-चरैवेति-चरैवेति. तुम्ही देखील हा मंत्र ऐकलेला असेल. त्याचा अर्थ आहे – चालत रहा- चालत रहा. हा मंत्र आपल्या देशात अत्यंत लोकप्रिय आहे कारण सतत चालत राहणे, गतिशील असणे हा आपल्या स्वभावाचा एक भाग आहे. एक देश म्हणून, आपण हजारो वर्षांची विकास यात्रा करून इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. एक समाज म्हणून आपण नेहमीच नवे विचार, नवे बदल यांचा स्वीकार करून पुढे आलो आहोत. याच्या पाठीमागे आपली सांस्कृतिक गतिशीलता आणि तीर्थयात्रांचे फार मोठे योगदान आहे. आणि म्हणून तर आपल्या ऋषी-मुनींनी, तीर्थयात्रेसारख्या धार्मिक जबाबदाऱ्या आपल्यावर सोपविलेल्या आहेत.आपण सर्वजण वेगवेगळ्या तीर्थयात्रा करत असतो.
यावर्षी चारधाम यात्रेमध्ये किती प्रचंड संख्येने भाविक सहभागी झाले ते तुम्ही सर्वांनी पाहिले असेलच.आपल्या देशात वेळोवेळी वेगवेगळ्या देवांच्या यात्रा देखील निघत असतात.देवांच्या यात्रा, म्हणजे केवळ भाविकच नव्हे तर आपले देव देखील यात्रेसाठी निघतात. आता काही दिवसांतच म्हणजे 1 जुलैपासून भगवान जगन्नाथांची यात्रा सुरु होणार आहे. ओदिशामधील पुरीच्या या यात्रेची माहिती तर प्रत्येक देशवासियाला आहे. या प्रसंगी पुरीला जाता यावे असे प्रत्येक भाविकाला वाटत असते. इतर राज्यांमध्ये देखील अत्यंत उत्साहाने जगन्नाथाची यात्रा काढण्यात येते. आषाढ महिन्यातील द्वितीयेपासून भगवान जगन्नाथांची यात्रा सुरु होते. आपल्या ग्रंथांमध्ये ‘आषाढस्य द्वितीय दिवसे….रथयात्रा’ अशा प्रकारचे संस्कृत श्लोक आपल्याला वाचायला मिळतात.
गुजरातमध्ये अहमदाबाद शहरात देखील दर वर्षी आषाढ द्वितीयेपासून रथयात्रा सुरु होते. मी गुजरातेत असताना, मला देखील दर वर्षी या रथयात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभत होते. आषाढ द्वितीया, जिला आषाढ बीज देखील म्हणतात त्याच दिवशी कच्छ समाजाचे नववर्ष देखील सुरु होते. मी माझ्या सर्व कच्छी बंधू-भगिनींना नववर्षाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. माझ्यासाठी ती तिथी अजून एका कारणासाठी विशेष महत्त्वाची आहे.
मला आठवतंय, आषाढ द्वितीयेच्या एक दिवस आधी म्हणजे आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी आम्ही गुजरातमध्ये एका संस्कृत उत्सवाची सुरुवात केली होती. या उत्सवात संस्कृत भाषेतील गीत-संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाचे नाव आहे ‘आषाढस्य प्रथम दिवसे.’ या उत्सवाला हे विशिष्ट नाव देण्याचे देखील खास कारण आहे. खरेतर, संस्कृतभाषेतील महान कवी कालिदास यांनी आषाढ महिन्यापासून वर्ष ऋतूच्या आगमन प्रसंगी मेघदूत नावाचे महाकाव्य लिहिले होते. मेघदूतात एक श्लोक आहे – आषाढस्य प्रथम दिवसे, मेघम् आश्लिष्ट सानुम् म्हणजे आषाढ मासाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखरांना वेधून बसलेल्या मेघा, आणि हाच श्लोक या उत्सवाच्या आयोजनाचा आधार झाला होता.
मित्रांनो,
अहमदाबाद असो वा पुरी, भगवान जगन्नाथ त्यांच्या या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला अनेक सखोल मानवी शिकवण देत असतात.भगवान जगन्नाथ जगाचे स्वामी तर आहेतच, पण त्यांच्या या यात्रेत गरीब आणि वंचित समुदायांचा विशेष सहभाग असतो. प्रत्यक्ष भगवान देखील समाजाच्या प्रत्येक घटकासोबत आणि प्रत्येक व्यक्तीसोबत चालतात. अशाच प्रकारे आपल्या देशात ज्या विविध प्रकारच्या यात्रा होतात त्यांच्यामध्ये गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा कोणताही भेदभाव बघायला मिळत नाही. या सर्व भेद्भावांपेक्षा अधिक उच्च पातळी गाठून यात्राच सर्वात महत्त्वाची ठरते.
उदाहरण सांगायचे तर, महाराष्ट्रातल्या पंढरपूरच्या यात्रेबद्दल तुम्ही सर्वांनी नक्कीच ऐकले असेल. पंढरपूरच्या यात्रेत कोणी मोठा नसतो आणि कोणी लहान नसतो. यात्रेतला प्रत्येक जण वारकरी असतो, विठ्ठलाचा भक्त असतो. आता चारच दिवसांनी अमरनाथ यात्रा देखील सुरु होते आहे.संपूर्ण देशभरातील श्रद्धाळू भाविक, अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीरला पोहोचतात. जम्मू-काश्मीरची स्थानिक जनतादेखील तेवढ्याच उत्साहाने या तीर्थयात्रेची जबाबदारी पार पाडते आणि यात्रेकरूंची सर्व प्रकारे मदत करते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1541084095375364096?s=20&t=uy6c_GQlUzQ5H4o8zE4mQQ
prime minister narendra modi aashadhi vari mann ki baat