इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना खुलं आव्हान दिलंय. त्यांनी नारायण राणे यांनी मला धमकी दिली असल्याचा दावा केला आहे. माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला नितेश राणे जबाबदार राहतील असे म्हटलं आहे. राणे यांच्या कार्यकर्त्यांचे मला धमकीचे कॅाल चालू असल्याचाही आरोप केला. मी उद्या संभाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ साडे दहा वाजता येऊन उभं राहतो. राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मला जीवे मारायचं असेल तर त्यांनी मारावं, मी त्यांच्या धमकीला घाबरणारा नाही. मी महाजन आहे हे त्यांनी विसरु नये असं खुलं आव्हान दिलं. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं पाहिले. धमकी देणारे तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर जनतेचं काय होईल असा सवालही केला.
प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवर बोलतांना म्हटले होते की, त्यांना वैचारिक उंची नाही. उठले की लवंग व बसले वेलची. या वक्तव्यावर नारायण राणे यांनी ‘तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलताय, आमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण?’ असे प्रत्त्युत्तर प्रकाश महाजनांना दिले.
राणे यांनी पुढे म्हटले की, टीव्ही-9 च्या पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे. श्रीयुत राज आणि माझ्या (नारायण राणे) बद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? कुठल्या एखादया पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करु नये एवढी तुमची कुवत नाही. श्रीयुत नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता, बुध्दीमता जनमानसातील प्रतिमा या वयात सिध्द केली आहे. श्रीयुत निलेश, नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात ?
आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण निलेश, नितेशना निष्ठा शिकविण्याची गरज नाही. तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलटया करायला लावेन. असे राणे यांनी म्हटले.