मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ प्रा ए बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहार कामगारांचा मोर्चा ७ मार्च रोजी काढण्यात आला. या मोर्चानंतर दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात फेडरेशनचे राज्य सरचिटणीस डॉ अशोक थोरात यांनी सविस्तर माहिती दिली.
या प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणाऱ्या शालेय पोषण आहार कामगारांमध्ये विधवा , परितकत्या, घटस्फोटीत, दलित, ओबीसी व गरीब घरातील गरजू पुरुष महिला काम करतात. त्यांना सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक प्रकारची कामे करावे लागतात. त्यांचा या कामांमध्ये ६ तास वेळ जातो आणि या मोबदल्यात त्यांना देशात इतके कमी मानधन कुठेच नाही असे ८३ रुपये रोज या प्रमाणे 2500 रुपये महिना मानधन दिले जाते. आणि ते पण वेळेवर मिळत नाही. 5 जुलै 2024 रोजी राज्य शासनाने कॅबीनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनामध्ये १ हजार रुपयाची वाढ करून शासन निर्णय जाहीर केलेला आहे . पण त्याची अंमलबजावणी केली नाही. शालेय पोषण आहार कामगारांना १० महिने ऐवजी १२ महिने मानधन द्या, शालेय पोषण आहार कामगारांना केरळ राज्य प्रमाणे १८ हजार रुपये मानधन द्या, भाऊबीज म्हणून दिवाळीच्या सणाला बोनस द्या, शालेय पोषण आहार कामगारांना शासकीय सेवेत कायम करा, वर्षातून दोन युनीफॉर्म द्या. ५ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करा. इत्यादी सह अनेक मागण्यांसाठी आझाद मैदान येथे महाराष्ट्रातून हजारो महिलांनी मोर्चा मध्ये सहभाग नोंदवला होता. या वेळी शासनाच्या विरोधात घोषणा देऊन आझाद मैदान घोषणांनी दणाणून सोडले होते. यावेळी पाच जणांचे शिष्टमंडळ शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना भेटून सविस्तर चर्चा करण्यात आली. १ हजार रुपयांच्या वाढीसाठी या अधिवेशनामध्ये निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल अशा अनेक मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील असे शालेय शिक्षणमंत्री यांनी आश्वासन दिले.
यावेळी मोर्चाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वतीने सचिव मंडळ सदस्य कॉ शैलेंद्र कांबळे कॉ एस के रेगे , सीटू चे राज्य कोषाध्यक्ष कॉ के आर रघु , अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या राज्याच्या नेत्या व सीटूच्या पदाधिकारी कॉ आरमायटी इराणी, तलासरी पंचायत समितीच्या सभापती कॉ सुनीता शिंगडा, कॉ ए बी पाटील, कॉ डॉ अशोक थोरात, कॉ मिरा शिंदे, कॉ अनिल मिसाळ, कॉ भैया देशकर, कॉ शरद पाटील यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. या वेळी त्यांच्या सह फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते तसेच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी महादेव गारपवार, लता खेपकर, नंदा बांगर, हेमलता शेळके, रामचंद्र बरफ, वैशाली मुंजेवार, संगीता चौधरी, गणेश जाधव, संतोष शिर्के, कुसुमताई देशमुख, दिलीप पोपळे, सुरेश धायगुडे इत्यादी सह अनेक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा यशस्वी केला.