मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा)चे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र, विधान भवनाबाहेर येताच ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीचे कारण सांगितले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे गट-भाजप यांचे सरकार सत्तेत आले. या घडामोडीला वर्ष पूर्ण होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली. अजित पवार यांच्या नेतृत्वात बहुसंख्य आमदारांनी बंड केले. पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे ते आता पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत. या सर्व घडामोडींनंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे विधान भवनात आले. आणि त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
आज मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कारण, राज्यासाठी चांगलं काम करावं असं मी त्यांना म्हटलं आहे. सध्या सत्तेची साठमारी चालली आहे. त्यामध्ये राज्याचे प्रश्न मागे पडत आहेत. त्यांनी त्यात लक्ष घालावे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस नव्हता म्हणून शेतकरी हवालदिल होता. आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या अडचणी वाढू शकतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका असं मी अजित पवारांना सांगितलं. अजित पवारांसोबत मी अडीच वर्ष काम केलं आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित आहे. इतरांची जरी सत्तेसाठी धावपळ चालू असली तरी त्यांच्याकडून राज्यातील जनतेला वेळेवर मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा त्यांच्याकडे आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.