मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष झालं तरी अद्याप ठाकरे गटाला बसणारे धक्के काही कमी झालेले नाही. उलट शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सातत्याने कुणीतरी ठाकरेंची साथ सोडून त्यांच्याकडे जातोय. आता विधानपरिषदेतील आपले अस्तित्व राखण्याचे आव्हान ठाकरे गटापुढे उभे झाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत विधानसभेतील ५० आमदार भाजपसोबत सत्तेत सामील झाले. पण विधानपरिषदेतील आमदार ठाकरेंच्या बाजुने उभे होते. त्यांच्या भरवशावर ठाकरेंची ठाकूरकी होती असे म्हटले तरी चालेल. उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्यासह परिषदेत ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करणारे काही महत्त्वाचे नेते आहेत. पण ऐन वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाच्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. एवढेच नाही तर परभणी-हिंगोलीचे विप्लव बाजोरिया यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
ठाकरे गटाला बसलेले दोन लागोपाठ धक्के त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसले तरीही ते जबर धक्के आहेत, असे बोलले जाते. विधानसभेपाठोपाठ परिषदेतील संख्याबळही हळूहळू कमी होत असताना ठाकरेंपुढे आपले अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मनिषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांचा परिषदेतील कार्यकाळ पुढील वर्षी जुलैमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर त्यांचे भवितव्य शिंदे गटाच्या हातात असेल, हे नक्की.
कारवाईची तयारी
उद्धव ठाकरे यांनी दोन्ही आमदारांवर कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे. यासंदर्भातील याचिका परिषदेच्या सभापतींकडे दाखल करायची असते, पण हे पद रिक्त असल्यामुळे उपसभापती डॉ. निम गोऱ्हे यांच्याकडे याचिका दाखल करायची आहे. येत्या दोन-तीन दिवसांत दोघांवरही पक्षबदलाच्या संदर्भातील कारवाईची याचिका दाखल केली जाईल, असे कळते.