नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणातील चाणक्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक दौऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्न आणि विषयांवर जोरदार बॅटिंग केली. शिंदे-फडणवीसांचा अयोध्या दौरा, सावरकरांचा मुद्दा, ईव्हीएम मशीन, महाविकास आघाडी, विरोधकांची एकजूट असा सर्वच बाबींवर ते स्पष्टपणे बोलले.
शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनाला गेले आहेत. मात्र, राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. हे सगळं सोडून सगळ्यांना घेऊन अयोध्येला जायचं, यात प्राधान्य कशाला द्यायचं, हे ठरवा. आज अतिवृष्टी, शेती नुकसान याचा विचार नाही. तर, हे सरकार सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत ते हिंदुत्वाची भूमिका घेतात.आपण बघतोय सर्व मंत्रिमंडळ, आमदार, खासदार अयोध्येत गेले. आमची श्रद्धा शेतकऱ्यांशी निगडित आहे. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते. असा टोलाही त्यांनी लगावला.
हिंडेनबर्ग आणि अदानी प्रकरणावर संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी विरोधकांनी केली आहे. यासंदर्भात शरद पवारांनी वेगळी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची चौकशी हवी. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, जर सगळ्या विरोधकांची भूमिका असेल तर जेपीसी चालवा, माझा विरोध नाही. पण जेपीसी पेक्षा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची चौकशी योग्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सावरकरांच्या काही भूमिकेला आम्हा लोकांचा पाठिंबा नाही असे सांगत पवार म्हणाले की, त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली ती मान्य नाही. सावरकरांनी सांगितलं की गाय ही उपयुक्त पशू आहे. ज्या दिवशी तिची उपयुक्तता संपेल, त्याचे भक्षण केलं तरी चालेल. याला आमचा पाठिंबा नाही.
मतदान यंत्र (ईव्हीएम) विषयी अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. यावर पवार म्हणाले की, ईव्हीएममध्ये जी चीप टाकतात, त्यावर काही तज्ज्ञ लोकांना शंका आहे. यावर आम्ही काही प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाला दिले. आमची शंका दूर करा, आमची काही तक्रार नाही. पण जर तशीच निवडणूक घेतली, तर आमची शंका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1644965856781418496?s=20
Politics NCP Chief Sharad Pawar Nashik Press Conference