नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारला २०२४मध्ये शह देण्याची क्षमता असलेल्या आणि देशातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षामागे सध्या शुक्लकाष्ट लागल्याचे स्पष्ट होत आहे. पंजाबमधील राजकीय कलह शांत होत नाही तोच आता आणखी एका राज्यात काँग्रेस पक्षांतर्गत बंडाळी उफाळून आली आहे. त्यामुळेच केवळ एक-दोन नाही तर तब्बल अर्धा डझन आमदार काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना त्याची तत्काळ दखल घेऊन योग्य ती डॅमेज कंट्रोल पॉलिसी राबवावी लागणार आहे.
पंजाब नंतर आता मणिपूरमध्ये काँग्रेससमोरील आव्हाने वाढत आहेत. कारण एकामागून एक आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अलीकडेच आमदार राजकुमार इमो सिंग आणि यान्थोंग हुकीप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण ही पक्ष बदलाची हवा एवढ्यावरच थांबणार नाही, तर आता आणखी ६ आमदार एकत्रपणे सोडू शकतात, असा पक्षाचा विश्वास आहे. मणिपूर विधानसभा निवडणुकीत पक्षाची अडचण वाढत असल्याचे एका राज्य काँग्रेस नेत्याने सांगितले. आतापर्यंत भाजप आघाडी आणि काँग्रेस यांच्यातच लढत होत होती. पण तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने अनेक जागांवरची लढत तिरंगी होऊ शकते.
निवडणुकीपूर्वी मणिपूरमध्ये अर्धा डझनहून अधिक आमदार काँग्रेस सोडू शकतात, असे पक्षाच्या काही नेत्यांना वाटत आहे. कारण यातील अनेक आमदारांची कामे पक्षशिस्तीविरुद्ध आहेत. त्यामुळे हे आमदार निवडणुकीपूर्वी अन्य पक्षात जागा शोधू शकतात. तृणमूल काँग्रेसने मणिपूरमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर पक्ष बदलणाऱ्या आमदारांपुढील पर्याय आणखी वाढले आहेत. त्यामुळे त्यांची भाजप आणि तृणमूलशी गुप्त बोलणी सुरू आहेत. मात्र, असे अनेक आमदार आहेत, ज्यांना भाजपच्या तिकिटावर जिंकणे कठीण होणार आहे.
या आमदार आणि माजी आमदारांना टीएमसीच्या रूपाने मजबूत पर्याय मिळाला असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. सन २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने सात जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांचे आमदार काँग्रेस आणि भाजपमध्ये दाखल झाले. २०१७ मध्ये पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली. टीएमसीने राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मणिपूरमध्ये आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत भर पडली. कारण, पश्चिम बंगालमधील विजयानंतर टीएमसी हा काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. अशा परिस्थितीत टीएमसी विधानसभेच्या निवडणुका लढवून विरोधी मतांची विभागणी करू शकते.