नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोदी सरकारमध्ये सध्या असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या कामाची मूल्यमापन करण्यात येत असून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. ज्यांचे प्रगतीपुस्तक फारसे प्रभावी नाही किंवा खराब आहे, अशा मंत्र्यांची उचलबांगडी करण्यात येणार येईल, अशी माहिती त्यामुळे समोर येत आहे.
केंद्रीय पक्षनेतृत्व अनेक मंत्र्यांच्या कामावर असमाधानी आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्र्याच्या कामाचे मूल्यमापन केले जात आहे. केंद्र सरकारच्या कामांना मंत्रालयाने जमिनीवर, अखेरच्या घटकापर्यंत नेले आहे का, याची तपासणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटाचे दोन खासदारही केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारमधील सध्याच्या एक डझन म्हणजे १२ मंत्र्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांचे मंत्रालयही बदलले जाणार असल्याचे सांगण्यात येते आहे.
यापूर्वी मागील वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंळ विस्तार केला होता. २०१९मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर केलेला हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होता. यात ४३ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. सर्बानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह ३६ नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. तर उर्वरित सात हे आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्री होते. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे हवाई वाहतूक मंत्रालय तर मनसुख मंडाविया यांना आरोग्य मंत्रालय देण्यात आले होते.
राज्यात एकनाथ शिंदे यांचे भाजपासोबत सरकार स्थापन झाले असून, शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांचा गटही शिंदे यांनी फोडला आहे. राज्यात मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर केंद्रातही या गटाला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे आणि प्रतापराव जाधव या दोन खासदारांच्या नावांची चर्चा सध्या शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी सुरु आहे.
या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आगामी काळात ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत, त्यातील काही नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा निवडणुकांसाठीही ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे किंवा ज्या ठिकाणी गरज आहे अशा भागातील खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपल्यामुळे नुकतेच दोन मंत्र्यांची त्यांच्या पदांचे राजीनामे दिलेले आहेत. त्यात मुख्तार अब्बास नक्वी आणि जेडीयूच्या आरसीपी सिंह यांचा समावेश आहे. या दोघांच्या मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार हा स्मृती इराणी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
PM Narendra Modi Union Ministers Performance
Cabinet Appraisal