इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वक्फ (सुधारणा) विधेयक व मुसलमान वक्फ (निरसन) विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे हा ऐतिहासिक निर्णय असून हे सामाजिक आर्थिक न्याय , पारदर्शिता व सर्वसमावेशक प्रगतीसाठी चाललेल्या आपल्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेले यश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे स्वागत केले आहे.
एक्स वर लिहिलेल्या त्यांच्या पोस्ट साखळीत त्यांनी म्हटले ,“वक्फ ( सुधारणा ) विधेयक व मुसलमान वक्फ (निरसन) विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे हा ऐतिहासिक निर्णय असून हे सामाजिक-आर्थिक न्याय , पारदर्शिता व सर्वसमावेशक प्रगतीसाठी चाललेल्या आपल्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेले यश आहे. अनेक वर्षे ज्यांना केवळ आपले मत मांडण्याची संधी नसल्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होता येत नव्हते, त्यांना यामुळे मोठी मदत होणार आहे.”
“संसदीय तसेच समितीच्या चर्चेत सहभागी होऊन स्वतःचे दृष्टिकोन मांडून या कायद्यांना अधिक बळकट बनवणाऱ्या सदस्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करीत आहे. संसदीय समितीकडे आपल्या अमूल्य सूचना पाठवणाऱ्या देशभरातील अगणित नागरिकांना विशेष धन्यवाद. व्यापक चर्चा व संवादाचे महत्व यातून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.”
“अनेक दशकांपासून वक्फ प्रणालीतील अपारदर्शकता व उत्तरदायित्वाचा अभाव दिसून येत होता. यामुळे मुस्लिम महिला, गरीब मुस्लिम व पसमांदा मुस्लिमांच्या हितांना बाधा येत होती. संसदेत मंजूर झालेल्या या कायद्यांमुळे पारदर्शकता वाढेल व लोकांच्या हक्कांचे रक्षण होईल.”
“आता आपण अशा एका पर्वात प्रवेश करत आहोत, जिथे संरचना आधुनिक व सामाजिक न्यायानुरूप असेल. देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनाची प्रतिष्ठा सर्वोपरी राखण्यास आपण वचनबद्ध आहोत. याच प्रकारे आपण एक अधिक बळकट, अधिक सर्वसमावेशक व अधिक अनुकंपा असलेल्या भारताची निर्मिती करत आहोत.”