पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – वाढीव मजुरीसह वाढीव वाराही मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारपासून काम बंदचे हत्यार उपसलेल्या माथाडी कामगार टोळी दोनच्या जवळपास ३५० कामगारांनी आपला संप गुरुवार दि.११ रोजी मागे घेतला. कांदा लिलाव बंदमुळे दोनच दिवसात पिंपळगाव बाजारसमितीची जवळपास १२कोटींची उलाढाल ठप्प होती. संप मागे घेतल्यानंतर शुक्रवारपासून पिंपळगाव बाजारसमितीत कांदा लिलाव पूर्ववत होणार असल्याची माहिती पिंपळगाव कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.
पिंपळगाव शहरातील माथाडी कामगार टोळी दोनच्या जवळपास ३५० कामगारांनी मंगळवारपासून वाढीव मजुरीसह वाढीव वाराही मिळावी या प्रमुख मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. सलग दोन दिवस माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन कायम ठेवल्याने पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्पच होते. बुधवारी कामगार आयुक्त यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना वेठीस न धरता कामावर हजर होण्याच्या सूचनेसह माथाडी कामगारांच्या दर निश्चितिबाबत चर्चा झाली. याबत व्यापाऱ्याना पत्र देऊन सकारात्मक चर्चा झाल्याने माथाडी कामगारांनी गुरुवारी संप मागे घेतल्याने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कांदा लिलाव शुक्रवार पासून पूर्ववत होणार असल्याची माहिती पिंपळगाव कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.