चंडीगड – पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आला आहे. काँग्रेसअंतर्गत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात अखेर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा द्यावा लागला. राज्यपालांकडे दुपारी चार वाजता त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.
राजीनामा दिल्यानंतर ते पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले, की दोन महिन्यात तीनदा विधीमंडळ दलाच्या आमदारांना बोलावण्यात आले. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांना मुख्यमंत्री करावे. सध्या काहीही बोलणार नाही. साडेनऊ-दहा वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिलो आहे. काँग्रेस पक्षात कायम राहणार असून समर्थकांशी बोलून पुढील दिशा ठरविली जाईल. तत्पूर्वी एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यादरम्यान ते म्हणाले, की असा अपमान होत असताना पक्षामध्ये राहू शकत नाही. दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेनंतर कॅप्टन यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला हवा मिळाली आहे.
दरम्यान, पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, प्रताप सिंह बाजवा आणि बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंह बिट्टू यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.