इस्लामाबाद – प्रत्येक बाबतीत भारताशी केविलवाणी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणार्या पाकिस्तानमध्ये नागरिकांचे खाण्या-पिण्याचे वांदे झाले आहेत. भ्रष्टाचार, दहशतवाद आणि महागाईने पाकिस्तानला पोखरून टाकले आहे. त्याची परिणिती म्हणून पाकिस्तानमध्ये अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्योगधंदे आणि आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आटल्याने पाकिस्तानात बेरोजगारीचा दर सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर उच्च न्यायालयात एका शिपाई पदासाठी कमीत कमी १५ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. यामध्ये एमफिल पदवीधारकांचाही समावेश आहे. यावरून पाकिस्तानच्या बेरोजगारीच्या दराचा अंदाज लावला जावू शकतो. पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार नागरिकांना रोजगार देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकोनॉमिक्स (पीआयडीई) च्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचा दर १६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या ६.५ टक्क्यांच्या दाव्याच्या हा अगदी उलटा आकडा आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, पीआयडीईने बेरोजगारीच्या वाढत्या दराचे एक गंभीर चित्र समोर आणले आहे. देशात सध्या कमीत कमी २४ टक्के सुशिक्षित बेरोजगार आहेत. देशातील ४० टक्के सुशिक्षित महिला (पदवीधर किंवा त्याहून खाली) सुद्धा बेरोजगार आहेत, असे पाकिस्तानच्या योजना आणि विकासावरील सिनेटच्या स्थायी समितीला दिलेल्या अहवालात पीआयडीईने म्हटले आहे.