नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित आणि इतर धर्मियांवर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचे सुनियोजित षडयंत्र असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी आयएसआयने मोठा कट रचला आहे. त्याअंतर्गत त्याअंतर्गत २०० नागरिकांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाल्यानंतरही पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचे प्रोत्साहन मिळत आहे.
आयएसआय आणि दहशतवाद्यांमध्ये बैठक
गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांच्या प्रमुखांची नुकतीच भेट घेतली होती. ही बैठक २१ सप्टेंबरला झाली होती. या गोपनीय बैठकीचे अनेक पुरावे भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे.
हे होते निशाण्यावर
दशहतवादी संघटनांनी काश्मीरमध्ये आणखी सक्रिय होऊन हल्ले वाढविण्याच्या सूचना आयएसआयने केल्या आहेत. विशेषतः काश्मिरी पंडित आणि इतर धर्मियांवर हल्ले करण्यास सांगितले आहे. काश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना उतरविण्याचा कट आयएसआयने रचला आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लक्ष्य करून त्यांना ठार करण्याचेही षडयंत्र रचले आहे. काश्मिरी पंडित, इतरधर्मिय, पोलिस, सुरक्षारक्षक आणि गुप्तचर विभागात काम करणार्या काश्मिरी नागरिकांवर हल्ले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनाही लक्ष्य करण्याचे नियोजन आहे.
पडद्याआडून ही कामे
हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांनी आपली भूमिका बदललेली आहे. दहशतवाद्यांना सामान, वस्तू किंवा माहिती पोहोचविण्याची मदत करणार्या ओव्हर ग्राउंड वर्करवर (ओजीडब्ल्यू) हल्ले आणि हत्या करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दहशतवादी पडद्यामागे राहून सहकार्य करण्याची भूमिका अदा करणार आहे. जगातील इतर देशांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न पाकिस्तानने सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जबाबदार ठरविले जाऊ नये यासाठी स्थानिक वर्करच्या हातून हत्या करण्याचे नियोजन आखले जात आहे.