इस्लामाबाद – कर्जाच्या बोझाखाली दबलेल्या इम्रान सरकारला नक्की काय करावे, हेच कळत नाहीय. त्यामुळेच आता इम्रानने चक्क कर्ज काढून पाकिस्तानातील गरिबांना चक्क तूप वाटण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अनेक देशांकडून आश्चर्य व्यक्त होत असून पाकिस्तानातील अर्थतज्ज्ञांनीही यावर टीका केली आहे.
गरीब कुटुंबांसाठी 120 अब्ज रुपयांचे अनुदान पॅकेज इम्रान खानने जाहीर केले आहे. या अंतर्गत लाभार्थी कुटुंबांना पीठ आणि डाळींसोबत तूपही सवलतीच्या दरात दिले जाणार आहे. एकाचवेळी अनेक आघाड्यांनी घेरलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेतील वाढता नाराजी कमी करण्यासाठी ही योजना सुरू केल्याचे मानले जात असून, ही योजना त्यांनी पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठी कल्याणकारी योजना असल्याचे म्हटले आहे. गरिबांना स्वस्त दरात अन्नपाणी देणे हे निश्चितच चांगले पाऊल आहे, पण पाकिस्तानला ही अनुदानाची रक्कम कुठून मिळणार, असा प्रश्न निर्माण होतो.
काही राजकीय तज्ज्ञांना असाही प्रश्न पडतो की, उद्देश फक्त गरिबांना मदत करणे हाच आहे, मग ही योजना केवळ पुढील 6 महिन्यांसाठीच का आहे. पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, लाभार्थी कुटुंबांना 30 टक्के कमी किमतीत पीठ, तूप आणि डाळ दिली जातील. त्यामुळेच खान यांच्या सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी 20 दशलक्ष कुटुंबांसाठी पीठ, डाळी आणि तूप खरेदी करण्यासाठी 120 अब्ज रुपयांची तरतूद केली आहे.
पाकिस्तानची सर्वात मोठी कल्याणकारी योजना असल्याचे वर्णन करताना इम्रान खान म्हणाले की, यामुळे पाकिस्तानला खऱ्या अर्थाने कल्याणकारी राज्य बनवले आहे, कारण याचा फायदा देशातील 130 दशलक्ष लोकांना होणार आहे. ही सबसिडी 260 अब्ज रुपयांच्या पर्यंत आहे. याशिवाय 12 कोटी कुटुंबांना रोख मदत दिली जात आहे. सुमारे 40 लाख कुटुंबांना बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणाही इम्रान खान यांनी केली.
इम्रान खान यांनी अशा वेळी या घोषणा केल्या आहेत, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पाकिस्तान कर्जाच्या जाळ्यात कसा अडकतो, हे जगापासून लपलेले नाही. नुकतेच सौदीतून कर्ज घेऊन परतलेल्या इम्रान खान यांनी नव्या योजनांनी आधीच रिकाम्या असलेल्या सरकारी तिजोरीवरचा बोजा वाढवला आहे. त्यातच आपली खुर्ची वेळेच्या आधी जाऊ शकते, अशी भीती इम्रान खान यांना वाटत असून अशा स्थितीत ते जनतेला खूश करण्यासाठी आणखी काही डाव खेळू शकतात, असे मानले जाते.