नवी दिल्ली – मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे देशातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद्यासह (उन्हाळी) इतर खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी दर वाढून महागाई वाढण्याचीही शक्यता आहे. क्रिसिल रिसर्च संस्थेने केलेल्या संशोधनात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळासह खरीप पिकांची आवक लांबल्याने साठवलेला माल खराब होण्याची शक्यता आहे. परिणामी दर वाढण्याची शक्यता आहे.
देशातील अनेक भागात पुरामुळे उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते, असा इशारा भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि राष्ट्रीय हवामान संस्थेने शनिवारी दिला आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाताचे पीक पाण्याखाली गेले आहे. उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये पूर परिस्थितीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. सध्या मॉन्सून परतण्याच्या मार्गावर असताना इतका मोठा पाऊस कोसळला आहे.
तज्ज्ञ काय सांगतात
पंजाबचे कृषी विभागाचे माजी संशोधक अशोक रंजेन सांगतात, मुसळधार पाऊस असाच कायम राहिला तर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. आयएमडीने अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियान इकोनॉमी या खासगी डाटा सेंटरच्या माहितीनुसार, उत्पादन घटल्यास अन्नधान्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात.