गेल्या सात दशकात असं बदललं नाशिक
नाशिक चे सिंहावलोकन करताना ओठी ओळी आल्या..
” या भवनातील गीत पुराणे
मवाळ हळवे सूर जाऊ द्या येथूनी दूर..
खरेच आहे जग झपाट्याने बदललेय आठवणीत रमायचे किती? सात दशकांत नाशिक किती बदलले जे आमचे वाटायचे गल्ल्या, बोळ, मंदिरं, मेनरोड, पांडवलेणी, तपोवन, गोदावरी काठचे नारोशंकर, काळाराम, लक्ष्मीनारायण, गोदावरी मंदिर, गांधी ज्योत.
दरवर्षी नैसर्गिक महापूर येई. मंदिर येथेच्छ न्हाऊन घेत. गंगेवर विस्तीर्ण पटांगणात फुललेला भाजीबाजार, ताजा भाजीपाला मांडलेला. मे महिन्यात भरणारी अत्यंत श्रवणीय अशी वसंत व्याख्यानमाला, महापुराला वर्षांनुवर्ष आव्हान देणारा व्हिक्टोरिया पूल, त्याच्या कठड्यावरून पुरात उडय़ा घेणारी हिंमतबाज पोरं, सरकार वाड्याच्या पायऱ्यांना नमस्कार करून जाता जाता सराफ बाजार कापड व भांडे बाजार यांची घाबरगुंडी उडवणारे पुराचे पाणी दहिपुलाला गळ्यापर्यंत बुडविल्या शिवाय परतत नसे.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि लेखक
मो. 9860050016
अनेक वर्षांच्या काल प्रवाहात होत्याचं नव्हतं झालं. पंचवटीची शान असलेला भाजीबाजार बारा वर्षांनी येणा-या सिंहस्थाच्या नावाखाली उद्ध्वस्त केला .गरीब दुबळ्या विक्रेत्यांना भिकेला लावले. पावन रामकुंड स्वच्छतेसाठी आलेले रुपये ज्याच्या त्याच्या घरी गेले. ती दुर्गंधी नदीकाठी अजुनही रेंगाळत आहे. नाशिकचा मेनरोड हे वैभव होते. चार पाच थिएटर्स, ज्यात वैभवशाली हिंदी, मराठी सिनेमे आम्ही पाहिले. पांडे मिठाई, बुधा व सरवटेंची जिलेबी भगवंतरावांची रंगीबिरंगी मिसळ, मकाजी, कोंडाजी पैलवानांचा खुमासदार चटकदार चिवडा. गंगेवर बसून यांचा चिवडा व भेळभत्त्याचे बकाने भरून खाण्याची लज्जतच न्यारी असे. पु.ल. देशपांडे म्हणाले होते पाणीपुरी, आइस्क्रीमची चौपाटी अजूनही आहे. पण चव नाही. मेनरोडच्या गर्दीत तरूणींना चुटपूटते स्पर्श करण्याची पोरांची अहमहमिका लागे. चुकून फसला तर येथेच्छ मार खाई.
रात्रभर मख्ख चेहे-याच्या पारश्याची मेहेर, कॅफे हिंद, सारखी हॉटेल्स उघडी असायची. तेथे चहा व खारी मिळे. स्वस्त असूनही खिशात पैसे नसत. सोमेश्वर त्र्यंबकेश्वर पांडवलेणी येथे पायी वा एक आणा तासाच्या सायकलवर जायचो. घरची पिठलं पोळी घेऊन श्रावणी सोमवारी लेाक पांडवलेणे, म्हसरूळ, सोमेश्वरला जात. गर्द झाडीत वनभोजनाचा आनंद मिळे. पिठलं बटाट्याची भाजी, वड्या पाडलेले पिठले, पोळी भाकरी, लोणची व काड्याकुड्या पेटवून तीन दगडांच्या चुलीवर गरमगरम खिचडी शिजवून वाढली जाई. यात एकही पदार्थ हॉटेलातला नसे.
त्र्यंबकेश्वरी कोंबून माणसे भरलेली टॅक्सी मंदिरापर्यंत जाई. देवांचे सहज दर्शन मिळे. प्रशस्त पटांगणात बसून लोक घरच्या दशम्या खात. आणि आता देव श्रीमंत झाल्याने दुरावलेत. मैलभर लांब चारचाक्या पार्क करुन भर उन्हात पाय ओढत जायचे. तेथे तासनतास रांगेत उभ रहायचे. लहान मुलांपासुन वयोवृध्दांनी.आजूबाजूला पोलिसांचा फौजफाटा, अंगाची झाडाझडती. झाडा झुडपात डोंगराच्या मधोमध वसलेले नाशिक. आज उंचच इमारतींतील वन रुम, किचन मध्ये हरवलेय.
जुन्या नाशकातले शिसवी लाकडातले कलाकुसरीने नटकेले चौपदरी वाडे दिसेनासे झालेत. चित्रकारांच्या दोन तीन पिढ्या गंगेवरच्या मंदिरांची लँडस्केप्स करत आहेत. तरी त्याचं अद्यापही मन भरत नाही. सराफ बाजारातील पेशवे वाड्यातील सार्वजनिक वाचनालयात हजारो माणसे वाचनाने घडली. त्या वाचनालयाचे ऐश्वर्यच वेगळे होते. तेथे अनेक विद्वत्जनांना पाहायला मिळाले. आमच्यात आलेला बहुश्रुतपणा ही वाचनालयाची मोठी देणगी आहे. ज्ञानपीठ विजेते, सर्वश्रुत नटसम्राटचे सृजनशील तात्यासाहेब शिरवाडकर तथा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि महाराष्ट्रातल्या वीस पंचवीस थिएटर्समध्ये ज्यांची नाटकं एकाचवेळी चालू असायची ते देखणे रुबाबदार वसंतराव कानेटकर.
तात्यासाहेबांचा प्रसन्न चेहरा निरागस हसू, अभ्यागतांना सदैव उघडे दार, परिणामी त्यांची विश्रांतीची जेवणाची लिखाणाची वेळेची तमा न बाळगता लोक येत राहत. मात्र कानेटकरांकडे तितकं सहजी प्रवेश नसे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजकारणात राहून कोणतेही सत्तापद न स्वीकारणारे दादासाहेब पोतनीस, कवी गोविंद, ना वा टिळक, देवदत्त टिळक, विनोदी लेखक गाजलेले “राणीचा बाग” नाटक कर्ते डॉ. अ. वा. वर्टी आणि कितीक. नाशिकपुरतं आभाळ असतं तर हे केवढं मोठं तारांगण पाहता आले असते. साठ सत्तरच्या दशकात भरपूर नाटके नाशिकला येत प्रयोग रुंग्ठा हायस्कूलच्या प्रांगणात होत.
त्यावेळी सायखेडकर नाट्यगृह अस्तित्वात नव्हते. भीमसेन जोशींचे गायन तर कधी वाजपेयींचे खुमासदार भाषण ऐकायला मिळाले. अत्रेंची अनेक नाटके तेथे यायची. दोन प्रसंग असे, भीमसेन जोशींचे गाणे होणार होते. तिकिटा पुरते पैसे नसायचे. छुपा मार्ग शोधून आम्ही आत घुसायचाे. अंधारात उभे राहायचो. नाटक वा गाणे सुरू झाले की पुढच्या रांगेत प्रथम जमिनीवर बसायचो. कुणी हुसकील ही भीती कायम मनात असायची.
मध्यंतरा नंतर अलगद गादीवर टेकायचो. भीमसेनजी गात होते, ताना घेत होते. नाना मुळे तबल्यावर होते. भीमसेनजी वरची तान घेऊन सोडून देत पुन्हा समेवर येण्याच्या मधल्या क्षणकालात ते शेजारी बसलेल्या वादकाशी हितगुज करीत. त्या दिवशी रंगात आलेले नाना मुळे तब्यल्याचा ठेका दणक्यात ठोकत होते. भीमसेनजींच्या लक्षात आले गडी वारुवर बसल्यागत पळतोय.. गाता गाता त्यांनी पालथ्या हातानेच ‘हळू रे बाबा’ सुचविले नाना चाळीसच्या स्पीडने तबला हाकू लागले. जरा वेळाने भीमसेनजी ‘इंद्रायणीकाठी लागली समाधी ज्ञानेशाची’ गात होते. त्यांच्या समोरच्या गादीवरचे कुटुंब पेंगत होते. भीमसेनजींनी ‘उजेड राहीले उजेड होऊन.. निवृत्ती सोपान मुक्ताबाई ‘म्हणताना हात त्यांच्या दिशेने केले. पहिल्या लायनीतले श्रोते जोरात हसू लागले.
एकदा बेबंदशाहीच्या प्रयोग होता सूर्यकांत संभाजी होते. त्यांच्या तोंडी अनेक आवेशपूर्ण संवाद होते. पण त्या दिवशी तो जोश येईना. स्टेजवर दुसरा प्रसंग सुरू झाला. मी व माझा भाऊ दशरथ विंगेत गेलो. सूर्यकांत अस्वस्थसे खुर्चीवर बसले होते. भावाने तंबाखूची पुडी व चुना त्यांच्या पुढे धरला. सूर्यकांतांनी चमकून भावाकडे पाहिले. व न बोलता तंबाखू मळू लागले. थोरला बार तोंडात भरला. भावाच्या पाठीवर थोपटत हसत म्हणाले, पोरा मनचं जाणलस रे! त्यांचा पुढचा प्रवेश गगनभेदी संवादांनी टाळ्या घेणारा ठरला.
असाच एक प्रसंग सांगण्यासारखं आहे. प्रसिध्द नाटककार, लोकसत्ताचे माजी संपादक श्री विद्याधर गोखले एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले होते. त्यांच्यासह गप्पाटप्पांची एक मैफिल आयोजित करण्यात आली होती. सिलेक्टेड पन्नासेक प्रतिष्ठित मंडळी आलेली होती. गोखले अतिशय गप्पिष्ट. काव्यशास्त्र विनोदातला बापमाणूस. जय जय गौरीशंकर, संगीत सुवर्णतुला, पंडितराज जगन्नाथ, मदनाची मंजिरी, सुवर्णतुला, मदनाची मंजिरी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली. मात्र सतत तोंडात पानाचा तोबरा ते सुद्धा तंबाखूचे. परिणामी त्यांच्या गप्पा इतक्या रंगत की समोरची मंडळीही ‘रंगून ‘जात. त्यांचे रंगलेले शर्ट हे त्याचे प्रमाण असे. एका श्रीमंत मारवाड्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे भाषण ठेवले होते .माणूस अबोल आणि बापुडवाणा, गरीब स्वभावाचा होता. मुख्य भाषणाआधी कार्यक्रमाचं यजमान म्हणून त्यांचे विषयी दोन शब्द बोला असं संयोजकांनी सांगितल्यावर विद्याधर जी उभे राहिले. त्यांच्याकडे एकदा डोळे भरून पाहून घेत बोलू लागले. आणि त्यांच्या भरजरी भाषेत त्यांनी त्यांचे इतके कौतुक केले, उदार कर्ण, हृदयतेचा सागर, राजा हरिश्चंद्र काय असंख्य उपमा अलंकारांनी त्या गरिबाला त्यांनी चिंब भिजवून टाकले. उत्तरादाखल तो बोलायला उभा राहिला तेव्हा सारखा रडू रडू करत होता. तो इतका उदार, दानशूर, गरिबांचा कैवारी विशाल हृदयी होता हे त्याला ही ठाऊक नव्हते. मनोमन त्याला वाटले असावे आपण किती उधळे, फुकट पैसा वाया घालवला आहे.
असेच एकदा सुलोचनाबाई चव्हाण यांचा लावणीचा कार्यक्रम होता. त्या व त्यांचे साजिंदे स्टेजवर. समोर पटांगणावर लोक दाटीवाटीने बसले होते. आदबशीरपणे पदर ओढून बसलेल्या बाईंचा गहिरा आवाज, गिर्रेबाज लावण्या ऐकून कडाडून टाळ्या पडत होत्या. बरेचसे रसिक तरुण, म्हातारे ही आवर्जून हजर होते. स्टेजवर इतरांबरोबर बाईंचे पती श्री.चव्हाण ढोलकीवर नेहमीच असायचे. एक रंगेल म्हातारबुवांनी चिठ्ठी लिहिली व शेजारच्या पोराला म्हटले, ‘ही चिठ्ठी बाईंना नेऊन दे!’ पोरगा अधिकच बेरड. तो म्हटला, ‘अहो आजोबा चिठ्ठय़ा चपटय़ा द्यायचं हे काय तुमचं वय आहे का.. बाई विवाहित आहेत आणि तो शेजारी बसलेला ढोलकीवाला दांडगा माणूस पाहिलास का.. तो त्यांचा नवरा आहे… अस्सल कोल्हापुरी… आजूबाजूला एकच हशा पिकला. खरे तर ती चिठ्ठी फर्माईशीची होती.अर्थाचा अनर्थ तो हाच.
पं. राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, बाळ कोल्हटकर, सतीश दुभाषी, आशा काळे, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, गो. नी. दांडेकर, जितेंद्र अभिषेकी यांचा बाज वेगळाच.. कितीक रंगकर्मी.. कितीक नाटक.. समृद्ध बालपण ते तेच. गांवकरीचे रसरंग त्याकाळी सिनेमा क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाई. एका भव्य पुरस्कार सोहळ्याला झाडून मोठमोठी मंडळी नाशिककरांनी पाहिली. गदिमा, जयश्री गडकर, सुलोचनाताई, लतादिदी, दादा कोंडके, आशा भोसले, ह्रदयनाथ मंगेशकर आदी बरेच दिग्गज आले होते.
आता नाशिक मेट्रोसिटी होणार म्हणे. गगनचुंबी इमारती, ताज सारखी पंचगल्ली बोळात मोठमोठे मॉल्स, तारांकित हॉटेल्स, प्रशस्त महामार्ग, फ्लायओव्हर्स, इंटरनॅशनल स्कूल्स, भव्यदिव्य माॅल्स, इलेक्ट्रोनिक्स मिडीयाचे नेटवर्क.. लेवून नाशिक भरजरी होत आहे. कॉलेज कट्ट्यावर बसून लाजून गुंजन करणारे तरुण तरुणी नव्या को-या लांबलचक चार चाक्यात बसून हवं. तेथे हवं त्यावेळी बिनधास्त बिअर, सिगार्स वडिलधाऱ्यांना न जुमानता भकाभक ओढत आहेत. पूर्वी गरिबीमुळे कपडे फाटके असत. आता तसेच पण महागडे कपडे तरुणाईला भावताहेत.आई वहिनीने घरी केलेले जेवण त्यांना नकोय. मॅकडोनाल्डचे पिझ्झा बर्गरची पार्सल्स त्यांना हवी असतात.
कित्येक घरातील तरुण तरुणी शिकून परदेशस्थ झालीत. मुले हाताशी येतील म्हणून आई बाप म्हातारपणची गंगाजळी शिक्षणाला लावतात. पाण्यात गळ टाकून बसतात. कधी तरी पोरगंं गळाला लागेल पण झगमगाटी परदेशी विशाल समुद्राने त्यास कधीच गिळलेले असते. या नाशकातही अशी शेकडो घरे आहेत. बंगले आहेत. तेथे ही पोरकी म्हातारी मंडळी राहतात. मोबाईल्सचे पीक उदंड झाले. देवापुढे न झुकणाऱ्या माना मोबाइल पुढे रात्रंदिवस नतमस्तक झाल्यात.” चला गिळून घ्या गरम पोळ्या करते आहे”अशी उचकून बोलावणारी बायको आता मोबाईलमध्ये पहात नव-याला “टेबलावर जेवण ठेवलंय!” ” पोळ्या कुठेत” तो मोबाईलमध्ये पाहतच विचारतो. घरातल्या घरात आई बाप भाऊ बायको हरवली आहे.
फोन बूथवर नाणं टाकूनही फोन न करता येणारी माणसं आज मोबाइल तलावात सराईतपणे पोहत आहेत. रामायण काळी मोबाइल असते तर सीतेचे सुवर्णमृगाकडे लक्षच गेले नसते. नाशिकच्या दंड कारण्याचा घोर अपमान झाला नसता. सिंहस्थात लाखो लोक छोट्याशा रामकुंडात डुबक्या मारण्यासाठी आटापिटा करतात. त्यात मोठय़ा संख्येने नाशिककरही असतात. पण घरच्या नळाला स्वच्छ पाणी गोदेचेच आहे हे विसरतात.
‘लास्ट एंपरर’ नावाच्या सिनेमाचा शेवट आठवतो. चीनचा एक राजकुमार सोन्याच्या राजवाड्यात ऐश्वर्यात वाढत असतो. भरजरी पोशाख, उंची अन्न दासदासी…पण कम्युनिस्ट राजवट येते. दहा बारा वर्षाचा असतानाच त्यास जीव वाचविण्यासाठी परागंदा व्हावे लागते. कुठेतरी जाऊन मोलमजुरी करून तो तरुण होतो. तेव्हा त्यास त्याचा राजवाडा पाहायची इच्छा होते. तो त्या शहरी जातो. तेथे गेल्यावर कोणत्याही जुन्या खुणा शिल्लक नसतात. तो राजवाड्याकडे जातो. तो पाहण्यासाठी तिकीट असते. याचे कडे पैसे नसतात. हा द्वारपालाच्या विनवून सांगतो,” बाबा रे हा राजवाडा माझाच आहे. मला डोळे भरून एकदा पाहू दे!” द्वारपाल त्यास वेडा समजून त्याची खिल्ली उडवून हुसकून देतो. आपल्याच नाशकात वावरताना सरकारी कार्यालये, हॉस्पिटल्स, पोलीस चौक्या, शिक्षण संस्था आपल्याला हाच अनुभव देतात. पैसे नसतील तर अक्षरश हुसकून देतात. असो.
कालाय तस्मै नमः