नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आपल्यावर चांगले संस्कार होत असताना त्या क्षणाला त्याचे महत्त्व बरेचदा कळत नाही. पण आयुष्याच्या प्रवासात पुढे गेल्यानंतर त्या संस्कारांची जाणीव होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या संस्कारांचे, संघाच्या कार्यपद्धतीचे नितीन गडकरी यांनी पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय सहज शब्दांत वर्णन केले आहे, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी मांडले. राजहंस प्रकाशनच्या वतीने ना. श्री. गडकरी लिखित ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन झाले. त्यावेळी सुनीलजी आंबेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वनामती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक तथा विचारक विवेकजी घळसासी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर राजहंस प्रकाशनचे नरेश सबजीवाले यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत ज्यांचा हातभार लागला त्यांचाही पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ संपादक लक्ष्मणराव जोशी, ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक, अनिल सोले, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, ‘तरुण भारत’चे प्रबंध संचालक धनंजय बापट, मुखपृष्ठ साकारणारे आर्टिस्ट राजेंद्र क्षिरसागर, दै. ‘तरुण भारत’चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री आशुतोष अडोणी यांचा समावेश होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागची प्रेरणा, संघाचा शंभर वर्षांचा प्रवास यावर श्री. आंबेकर यांनी प्रकाश टाकला. ‘संघाचे एक स्वयंसेवक म्हणून नितीन गडकरी यांनी स्वतः अनुभव घेतला. त्यानंतर संघ स्वयंसेवक म्हणून तसेच विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून त्यांना आलेली चांगली अनुभुती ते मांडतात, तेव्हा त्याचा समाजावर चांगला परिणाम होत असतो. कामे अनुकुल व्हायला लागली. लोकमान्यता मिळायला लागली, की सहजता हे मोठे आव्हान असते. संघ स्वयंसेवक नितीन गडकरींनी ही सहजता जपली आहे,’ असे श्री. आंबेकर म्हणाले.
श्री. विवेक घळसासी म्हणाले, ‘नितीन गडकरी यांच्यावर संघ आणि विद्यार्थी परिषदेचे संस्कार झाले, ही एक बाजू आहे. पण त्यांच्या मातोश्री स्व. भानुताई यांच्या संस्कारांचाही भाग तेवढाच मोठा आहे. आपण काहीतरी अलौकीक काम करतोय, असं वाटू न देता काम करत राहणे, हे फार आव्हानात्मक आहे आणि नितीन गडकरी यांनी हे आव्हान सहज पेलले आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.’ सूत्रसंचालन आशुतोष अडोणी यांनी केले. वैय्यक्तिक गीत अमर कुलकर्णी यांनी सादर केले. तर राधा ठेंगडी यांनी सादर केलेल्या पसायदानाने समारोप झाला.
संघ-विद्यार्थी परिषद आणि आईकडून मिळाले
मूल्यांचे प्रशिक्षण – ना. श्री. नितीन गडकरी
माझी आई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषद यांनी माझे जीवन बदलले. यांच्याकडून मला मूल्यांचे प्रशिक्षण मिळाले. बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, दत्तोपंत ठेंगडी, बाबुराव वैद्य, यशवंतराव केळकर या मंडळींचा प्रभाव माझ्या आयुष्यावर आहे. त्यांच्या सहवासातून आलेला अनुभव हीच माझ्यासाठी प्रेरणा ठरली. या पुस्तकात मला स्वयंसेवक म्हणून आलेली अनुभुती मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे, असे ना. श्री. गडकरी म्हणाले.
या पुस्तकाचे शब्दांकन श्री. शैलेश पांडे यांनी केले आहे. ना. श्री. गडकरी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच पुस्तकाच्या निर्मितीचे श्रेय शैलेश पांडे यांचे आहे, असे सांगितले. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘निर्णय करण्याचे धाडस, समाजाप्रती संवेदनशीलता यासाठी कन्व्हिक्शन लागत असते आणि ते मला संस्कारातून मिळाले. देशाकरिता, समाजाकरिता काही केले पाहिजे हा भाव आणि इच्छाशक्ती माझ्यात संस्कारांतूनच निर्माण झाली.’