नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फार्मा उद्योगात अनेक नवे संशोधन होत आहेत. या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील नवीन प्रयोगांवर आणि संशोधनांवर भर देण्याची गरज आहे. नागपुरात मोठ्या प्रमाणात फार्मा उद्योग येत आहेत. अनेक कंपन्यांचे काम सुरू झाले असून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार, दि. १५ मार्च) केले.
नागपूरच्या लोणारा स्थित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या औषध निर्माण शास्त्रच्या अंतिम बॅचचा पदवीदान सोहळा वनामतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला यावेळी हिमाचल प्रदेशचे तंत्र शिक्षण मंत्री राजेश धर्माणी, मुंबईतील अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर काझी, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी, माजी मंत्री अनिस अहमद आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘नागपुरात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (औषध निर्माण उद्योग) वाढत आहे. यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. या विद्यार्थ्यांनी विद्वत्ता आत्मसात करण्यासोबतच उद्यमशीलतेची कास धरून नोकरी देणारे तसेच रोजगार निर्माते बनावे. विदर्भाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे,’ असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.
गडकरी म्हणाले, ‘डॉ . बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणाले होते. शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्याचा विकास घडून येत नाही तर त्यामागे संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास होतो. एवढे सामर्थ्य ज्ञानामध्ये आहे.’
कोणतीही व्यक्ती तिच्या जाती-धर्माच्या आधारावर मोठी होत नाही. तर गुणांच्या आधारावर मोठी होते. त्यामुळे मुस्लिम समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा करावी, असे आवाहन गडकरी यांनी केले.