नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिकसाठी आवश्यक असलेल्या सीईटीपी आणि एसटीपी प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू व ही प्रकरणे नेमकी कुठे अडली आहेत त्याचा अभ्यास व पडताळणी केली जाईल,असे प्रतिपादन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले.
नाशिक दौऱ्यावर आले असता डॉ.अविनाश ढाकणे यांनी निमा सभागृहात उद्योजकांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते.नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा) तसेच अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(आयमा) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठावर निमाचे नूतन अध्यक्ष आशिष नहार,आयमाचे अध्यक्ष ललित बूब,राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड,प्रशांत गायकवाड,एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी जयवंत पवार,सिमाचे अध्यक्ष किशोर राठी, महाराष्ट्र चेंबर माजी अध्यक्ष संतोष मंडलेच्या, लघु उद्योग भारती अध्यक्ष निखिल तापडिया, मेटल फिनिशर्स अध्यक्ष आशिष कुलकर्णी आदी होते.
नाशिक मधील सीईटीपी आणि एसटीपी प्रकल्प गेल्या दोन दशकांपासून ताटकळत पडले आहेत असे माझ्या निदर्शनास आणण्यात आले आहे.इतकी वर्षे हा प्रकल्प लांबला जात असेल तर ते एक प्रकारे अपयशच म्हणावे लागेल अशी खंत व्यक्त करून उद्योग जगले पाहिजेत.धाक दाखवून घाबराविणे चालणार नाही.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ रेग्युलेटरी बॉडी असलो तरी ती फॅलीसिटेटर म्हणून काम करते याची आठवणही डॉ. ढाकणे यांनी करून दिली.भावी पिढीला चांगले वातावरण निर्माण करून देण्याची गरज आहे.हवेची व पाण्याची गुणवत्ता तसेच सामाजिक वातावरण चांगले असेल तेथे उद्योग वाढीला प्रोत्साहन मिळते असे सांगून त्यांनी पुणे शहराकडे सर्वांचेच लक्ष वेधले.उद्योगांमध्ये प्रदूषण वाढू देऊ नका असा सल्लाही त्यांनी नाशिकच्या उद्योजकांना दिला.पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नद्यांचे प्रदूषण थांबले पाहिजे.मेटल फिनिशर्स सांडपाणी प्रक्रिया करणे तसेच द्रव कचरा व्यवस्थापनावर काम करणे आवश्यक आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.एमपीसीबी पोर्टलची प्रमाणपत्रे उद्योगाने काटेकोरपणे अपडेट करावीत.सल्लागाराच्या नावाने ती करु नयेत असा निर्वाणीचा सल्लाही त्यांनी दिला.
निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी प्रास्ताविक केले. औद्योगिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निमातर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात.नाशकात सीईटीपी आणि एसटीपीची खरी गरज आहे.आम्ही सीईटीपी फाउंडेशनची स्थापनाही केली.परंतु सिईटीपी प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. नाशिककरांचे हे स्वप्न साकार झाल्यास आम्हाला आनंद वाटेल असे नहार यांनी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या निदर्शनास आणले. आमच्याकडे प्रदूषण करणाऱ्या मोठ्या कंपन्या नाहीत व नाशकातील एसटीपी आणि सीईटीपी प्रकल्प गेल्या दोन दशकांपासून का रखडले हा खरा संशोधनाचा विषय आहे. २०२७ चा सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन नाशिक शहर स्वच्छ सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापासूनच प्रभावी पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी सांगितले.
यावेळी डॉ.उमेश शर्मा, आशिष कुलकर्णी, समीर पटवा यांनी पर्यावरण विषयक विविध प्रश्न उपस्थित केले. त्याला डॉ.ढाकणे यांनी समर्पक उत्तरे दिली. सूत्रसंचालन मिलिंद राजपूत तर आभार प्रदर्शन राजेंद्र अहिरे यांनी केले.कार्यक्रमास स्टार्टअप इंडियाचे श्रीकांत पाटील,आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, ग्लेनमार्कचे किरण पाटील, जिंदालचे व्ही.चंद्रशेखरन, गोविंद झा, अविनाश गोखले, सचिन कंकरेज, अखिल राठी,कैलास पाटील, आदींसह विविध उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.