विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली मुंबई :
सुमारे सहा महिन्यापूर्वी मुंबईसह केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने सुरु केलेल्या सखोल चौकशी प्रकरणी अनेक पुरावे आता उघड होऊ लागले आहेत. एनआयएच्या आरोप पत्रामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यामुळे मुंबईतील अँटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेली कार प्रकरण, मनसुख हिरेन हत्या, सचिन वाजेला अटक, प्रदीप शर्मा यांच्यावर खूनाचा आरोप अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींची उकल होऊ लागली असून यात आणखी किती जण अडकले आहेत हे लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.
एनआयएने दि. ३ सप्टेंबर रोजी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून यात असे म्हटले आहे की, मनसुख हिरेन मर्डरचे काम माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला देण्यात आले. सचिन वाजे याने प्रदीप शर्माला खुनासाठी मोठी रक्कम दिली होती. या हत्येचा ठेका घेतल्यानंतर प्रदीप याने संतोष शेलार याच्याशी बोलून त्याला खुनात सामील होण्यास सांगितले. या संबंधित संशयित लोकांनी मिळून हिरेनचा खून केला. दि. ४ मार्च रोजी हिरेन मनसुखचा खून झाला, त्यापुर्वी दि. २ मार्च रोजी या सर्वांची बैठक झाली. या आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, दि.२ मार्च रोजी वाजे याने एक बैठक आयोजित केली होती त्यात एक पोलीस कर्मचारी सुनील माने आणि दुसरा पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा दोघेही उपस्थित होते. वाजे याने ही बैठक बोलावली, जेणेकरून दोघांना हिरेन कसा दिसतो आणि योजनेत कोणतीही अडचण येऊ नये याची माहिती मिळू शकेल. त्यामुळे सदर काम प्रदीप शर्माला देण्यात आले होते, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.
या षडयंत्राचा एक भाग म्हणून आरोपी प्रदीप शर्मा याने आरोपी संतोष शेलार याच्याशी संपर्क साधला आणि विचारले की तो पैशाच्या बदल्यात खून करू शकतो का ? त्यानुसार आरोपी संतोष शेलारने हे काम स्वीकारले. या प्रकरणातील वाजे आणि माने यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या उमेदवार म्हणून राज्य निवडणूक लढवण्यासाठी २०१९ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता तिघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान,आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, दि. ३ मार्च रोजी वाजे हे पुन्हा एकदा शर्मा याला भेटले आणि त्याला पैशांनी भरलेली बॅग दिली, त्यात सर्व ५०० रुपयांच्या नोटा होत्या. हे पैसे घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी शेलार यांना फोन करून लाल तवेराची व्यवस्था करण्यास सांगितले. हिरेनला मारण्यासाठी आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शर्माला या वाहनाचा वापर करायचा होता. विशेष म्हणजे याच आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, वाजे आणि माने यांनी ठरवल्याप्रमाणे बनावट कागदपत्रांच्या आधारे, पोलिस असल्याचे भासवले. तसेच माने यांनी दि. ४ मार्च रोजी संध्याकाळी मालाड येथे हिरेन त्याला भेटायला तयार केले. यावेळी माने याने हिरेन उचलले आणि शेलारकडे दिले, त्याच वेळी मनीष सोनी, सतीश मोथुकरी आणि आनंद जाधव या तिघांसह शेलार त्यांची वाट पाहत होते. या लोकांनी हिरेनला कारमध्येच ठार केले आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. त्यानंतर या प्रकरणाची सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती पुढे आता एनआयएने सर्व आरोपींना अटक केली आहे.
एनआयएच्या मते, वाजे हा हिरेनला स्फोटकाने भरलेली कार पार्क करण्याचे शुल्क द्यावे असे वाटत होते, पण तो त्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे मुंबई पोलिसांचे माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मदतीने हिरेनला अपहरण करण्यात आले. त्यानंतर हिरेनचा मृतदेह दि. ५ मार्च रोजी मुंब्राच्या रेतीबंदर खाडीत सापडला होता, मात्र त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात एनआयएने दोषी कॉन्स्टेबल विनायक शिंदे, क्रिकेट बुकी नरेश गौर, माजी पोलीस अधिकारी रियाझुद्दीन काझी, निरीक्षक सुनील माने, आनंद जाधव, सतीश मोथकुरी, मनीष सोनी आणि संतोष शेलार यांना वाजे आणि प्रदीप शर्मासह आरोपी म्हणून नावे दिली आहेत. एनआयएने या सर्वांवर खून, कट आणि अपहरणाचे आरोप निश्चित केले आहेत.
यावर्षी दि. २५ फेब्रुवारीला अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली. पोलिसांनी या कारमधून २० जिलेटिनच्या काड्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणामुळे मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत एकच खळबळ उडाली होती, त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे, हे त्यावेळी मुंबई पोलिसांच्या गुप्तचर शाखेचे प्रमुख होते, आणि या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र हे प्रकरण स्फोटकांशी आणि देशातील प्रख्यात उद्योगपतीशी संबंधित असल्याने तपास एनआयएने हाती घेतला होता. यानंतर, एनआयएने वाजेला अटक केली, त्याला संपूर्ण षडयंत्राचा मुख्य सूत्रधार म्हटले.
…..