इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना हार्वर्ड विद्यापीठातील प्रतिष्ठित ‘वार्षिक भारत परिषद’ मध्ये मुख्य वक्त्या म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्या हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी डीन नितीन नोहरिया यांच्यासोबत भारताच्या कला आणि संस्कृतीच्या विविध पैलूंवर तसेच जागतिक स्तरावरील भारताच्या योगदानावर चर्चा करतील. ‘फ्रॉम इंडिया टू द वर्ल्ड’ या थीम अंतर्गत ही परिषद १५-१६ फेब्रुवारी रोजी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात होणार आहे, ज्यामध्ये १००० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही काळात नीता अंबानी या जागतिक व्यासपीठावर भारताच्या सर्वात प्रभावी आवाजांपैकी एक म्हणून उदयास आल्या आहेत. हार्वर्ड विद्यापीठात त्या भारताची सॉफ्ट पॉवर आणि त्याची जागतिक स्तरावरील प्रासंगिकता नव्या दृष्टिकोनातून मांडतील. या परिषदेत तंत्रज्ञान, हवामान बदल, आर्थिक विकास, लोकशाही, राजनैतिक संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर भारताच्या भूमिकेवर चर्चा होईल.
हार्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून गेल्या २२ वर्षांपासून या परिषदेचे आयोजन केले जात आहे. ही परिषद अशा भारतावर प्रकाश टाकेल जो केवळ एका उदयोन्मुख महासत्तेच्या भूमिकेत नाही, तर आधुनिकता आणि प्रगतीसह ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेशीही दृढपणे जोडलेला आहे.