इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (रालोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी आम्ही एनडीए मधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. त्यामुळे एनडीएला हा मोठा धक्का बसला आहे. पशुपती कुमार पारस यांनी केंद्र सरकार आणि बिहारमधील नितिशकुमार सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. हे दोन्ही सरकार भ्रष्ट असून दलित विरोधी असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आमचा पक्ष लवकरच राज्यातील २४३ मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियान सुरू करणार असल्याचे सांगितले. स्वर्गीय रामविलास पासवान यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. पक्षाचे कार्यकर्ते गावा-गावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करणार आहेत. जो पक्ष आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये योग्य सन्मान देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, त्यासंदर्भात आम्ही पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन निर्णय घेऊ, कोणासोबत युती करायची हे अजून निश्चित झालं नाही, मात्र आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पशुपती पारस म्हणाले की, २०१४ पासून आम्ही एनडीएचे विश्वासू मित्रपक्ष होतो. पण आता आम्हाला ही गोष्ट देखील लक्षात घ्यावी लागेल की, जेव्हा लोकसभा निवडणूक होते तेव्हा, आमचा दलित पक्ष असल्यानं आमच्यावर प्रत्येकवेळी अन्याय होतो. जर महाआघाडीने आम्हाला योग्य सन्मान दिला तर भविष्यातील राजकारणाबाबत विचार करू असेही त्यांनी सांगितले.