मुंबई – राज्यात गाजत असलेल्या समीर वानखेडे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे जन्म प्रमाणपत्र प्रसारीत केले आहे. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचे दाखवून फायदा मिळवला असल्याचे दिसत आहे. एकंदरीत हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पाटील यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला. शेवटी सरकार पडत नाही म्हटल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केलाय व त्यातीलच एक आर्यन खान प्रकरण आहे. आर्यन खान प्रकरणात काही बाबी मलिक यांनी पुराव्यासहीत उघड केल्या आहेत. प्रभाकर साहील याने एनसीबी व समीर वानखेडे यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. हे सर्व धक्कादायक आहे. बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1452576236698411009








