मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी गाजलेले आर्यन खान आणि समीर वानखेडे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सीबीआयने एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्यनच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागणारा खासगी पंच के. पी. गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचे खोटे चित्रही वानखेडे यांच्या पथकाने उभे केले होते.
तसेच १७ जणांची नावे संशयित म्हणून वगळून त्यांना सोडण्याची परवानगी दिली होती. त्यात एका कथित ड्रग्ज विक्रेत्याचा समावेश होता. असा ठपका एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ‘एनसीबी’च्या दक्षता पथकाच्या अहवालाच्या आधारावर आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह ‘एनसीबी’चे तत्कालिन अधिक्षक विश्व विजय सिंह, तत्कालिन गुप्तवार्ता अधिकारी आशिष रंजन यांच्यासह के. पी. गोसावी, सॅन्विल डिसोझा आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात सीबीआयने खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी पेटले आहे
या प्रकरणात स्वतंत्र पंच असलेला के.पी. गोसावीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला सोडण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे २५ कोटींची मागणी केली आणि तडजोडीनंतर १८ कोटी रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती, असेही या अहवालात म्हटले आहे. विशेष चौकशी पथकाच्या अहवालानुसार, दि. २ ऑक्टोबर, २०२१ रोजी अंमलीपदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली, तेव्हा काही संशयितांची नावे प्रथम माहिती अहवालातून वगळण्यात आली होती आणि इतर काही आरोपींच्या नावांचा समावेश करण्यात आला होता.
सुरुवातीच्या ‘आय-नोट’मध्ये २७ संशयीतांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर सुधारित ‘आय-नोट’मध्ये फक्त १० नावे होती. अशा संशयितांच्या संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. पण त्याबाबत कोणतीही कागदपत्रे तयार करण्यात आली नाहीत. काही संशयित व्यक्तींना कोणत्याही कागदपत्रांशिवाय जाण्याची परवानगी देण्यात आली होती. याशिवाय, आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चटला चरस पुरवण्यात मदत करणाऱ्या सिद्धार्थ शाहलाही ‘एनसीबी’च्या या अधिकाऱ्यांनी मोकळे सोडले होते. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते .
https://twitter.com/BBCHindi/status/1451487086809387013?s=20
मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी, त्यांच्या अधिकारांत के. पी. गोसावी आणि प्रभाकर साईल यांना आरोपींविरुद्धच्या कारवाईत स्वतंत्र पंच म्हणून घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच तत्कालीन एनसीबी अधीक्षक व्ही.व्ही. सिंह यांना गोसावी यांना आरोपींना हाताळू देण्याचे निर्देश दिले होते. एनसीबी कार्यालयात गोसावी आणि इतरांना मोकळेपणाने वावरण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे गोसावी यांच्या ताब्यात आरोपी असल्योच चित्र उभे करण्यात आले. तसेच त्यांच्यामार्फत त्यांना एनसीबीच्या कार्यालयातही आणण्यात आले, असेही अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आपण एक जबाबदार, शिस्तप्रिय अधिकारी असून न्यायव्यवस्था आणि सरकारवर माझा विश्वास आहे. न्यायासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ, अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते याची सर्वांना उत्सुकता लागून आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1449303041237139460?s=20
NCB Officer Sameer Wankhede Enquiry CBI