नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-“ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध भारताने केलेल्या प्रभावी कारवाईत महिला वैमानिक आणि इतर महिला सैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली,” असा गौरवपूर्ण उल्लेख संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्यात आयएनएसव्ही तारिणीच्या स्वागतपर सोहळ्यात केला. सशस्त्र दलात महिलांचा सहभाग वाढल्यापासून त्यांनी प्रत्येक भूमिकेत अनन्यसाधारण कामगिरी करत प्रत्येक जबाबदारी पार पाडली आहे याकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले.
“सियाचीनच्या उंचीपासून समुद्राच्या खोलीपर्यंत, भारतीय महिला अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, ज्यामुळे देशाचे सुरक्षा कवच आणखी मजबूत झाले आहे. आज, सैनिकी शाळांचे दरवाजे मुलींसाठी खुले आहेत आणि या महिन्यात राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून 17 महिला उत्तीर्ण होत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या प्रत्येक शाखेत महिलांचा सक्रिय आणि प्रभावी सहभाग दिसून आला,” असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
‘नाविका सागर परिक्रमा II’यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारतीय नौदलाच्या दोन धाडसी महिला अधिकारी – लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए – मायदेशी परतल्या तेव्हा, ही ऐतिहासिक परिक्रमा मोहीम पूर्ण करताना त्यांच्या धाडसाचे, वचनबद्धतेचे आणि सहनशक्तीचे संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले. त्यांनी त्यांच्या या धाडसी सागरी प्रवासाला नारी शक्तीचे प्रतीक म्हटले.
मोहिमेच्या दुसऱ्या आवृत्तीत,’डबल हॅन्ड मोड’ने पराक्रम करणारी ही भारतातील पहिलीच जोडी ठरली आहे. या अधिकाऱ्यांनी आठ महिन्यांच्या कालावधीत फ्रेमंटल (ऑस्ट्रेलिया), लिटलटन (न्यूझीलंड), पोर्ट स्टॅनली (फॉकलंड बेटे) आणि केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) बंदरांचा प्रवास करत 25,600 नॉटिकल मैलांचे अंतर कापले.
शारीरिक आणि मानसिक अडथळ्यांचा सामना करत, ताकदीने त्यावर मात करून आणि आपण भारताच्या शूर कन्या आहोत हे जगाला दाखवून दिल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी दोघींचे कौतुक केले. आठ महिन्यांच्या प्रवासादरम्यान एकाकीपणाच्या भावनेवर यशस्वीरित्या मात करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या मनोबलाची त्यांनी दाद दिली. लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या धैर्य, दृढनिश्चय आणि ताकदीचे मोठे दर्शन घडवते जे प्रत्येकालाच सहजसाध्य नाही असे त्यांनी अधोरेखित केले.
विविध बंदरांना दिलेल्या भेटीदरम्यान स्थानिक आणि भारतीय वंशाच्या लोकांनी दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या केलेल्या हार्दिक स्वागताबद्दल बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी जगभरात तिरंगा फडकवून देशाला गौरवान्वित केले आहे.
“तुम्ही ज्या उत्साहाने हा प्रवास पूर्ण केला त्याच उत्साहाने या प्रवासाचे अनुभव शब्दबद्ध केले पाहिजेत. तुमचे चांगले वाईट अनुभव आणि मिळालेले धडे अवश्य नोंदवले पाहिजेत, जेणेकरून भावी पिढी, विशेषतः आपल्या तरुणी, त्यातून प्रेरित होतील,” असे राजनाथ सिंह यांनी या धाडसी द्वयीला सांगितले.
संरक्षण मंत्र्यांनी या महिला अधिकाऱ्यांशी काही दिवसांपूर्वी दूरदृश्य प्रणालीमार्फत केलेल्या आपल्या संभाषणाची आठवण करून दिली. या संवादामुळे आपण भावनांनी भारावून गेलो होतो असे राजनाथ सिंह म्हणाले. या महिला अधिकाऱ्यांच्या गोव्यात झालेल्या स्वागत समारंभाचा भाग झाल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. ही देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
विविध आव्हानांवर मात करण्यासाठी भारतीय नौदलाच्या शौर्याचा आणि लवचिकतेचा दाखला असे या मोहिमेचे वर्णन करून राजनाथ सिंह यांनी मोहिमेत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. नाविका सागर परिक्रमा II यशस्वीरित्या पूर्ण होण्याचे श्रेय संरक्षण मंत्र्यांनी प्रशिक्षक, तांत्रिक चमू आणि नौदलाच्या संसाधनांना दिले.
नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी आपल्या भाषणात, या दोघींची परिस्थितीशी जुळवून घेण्याची अनुकरणीय क्षमता, चिकाटी आणि अदम्य उत्साहाचे कौतुक केले. महिला अधिकाऱ्यांच्या या प्रवासाचा गौरवशाली सागरी वारशाला वाहिलेली आदरांजली असे वर्णन ॲडमिरल त्रिपाठी यांनी केले. हा प्रवास राष्ट्रीय सागरी जागरूकता वाढवण्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे हे त्यांनी अधोरेखित केले. या महिला अधिकाऱ्यांच्या प्रवासाची कहाणी नारी शक्तीच्या उत्साहाला पुनर्परिभाषा करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, या असाधारण परिक्रमा मोहिमेचे वर्णन करणारे ‘ब्रेकिंग वेव्हज, मेकिंग हिस्ट्री’ नावाचे एक छायाचित्रांचा समावेश असणारे निबंधपर पुस्तक प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक सागरी साहस आणि सागरी शोधावर एक अद्वितीय दृष्टीकोन असलेल्या सचित्र छायाचित्रांसह आणि समुद्रावरील जीवनातील अनुभवांचे उल्लेखनीय प्रवासाचे वर्णन करते.
नाविका सागर परिक्रमा II ची यशस्वी पूर्तता, भारतीय नौदलाच्या प्रतिभेचे जतन, साहसाला प्रोत्साहन आणि सागरी शोधात भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रदर्शन करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देते. दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी नौदल प्रमुखांनी गोव्यातील आयएनएस मांडवी येथून या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. 2017-18 मध्ये सहा सदस्यीय महिला चमूने या मोहिमेची पहिली आवृत्ती पूर्ण केली होती.
गोवा सरकारचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कँडावेलो; सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक व्हाइस ॲडमिरल आरती सरीन; दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल व्ही. श्रीनिवास; इतर वरिष्ठ नौदल अधिकारी; कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त) आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के तसेच लेफ्टनंट कमांडर रूपा यांचे कुटुंबीय आजच्या या समारंभाला उपस्थित होते.