मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या “मुख्यमंत्री १०० दिवस सुधारणा कार्यक्रम” अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला असून या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी आज मंत्रिमंडळ सभागृह, मंत्रालय मुंबई येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
नाशिक जिल्हा परिषदेने मुख्यमंत्री १०० दिवस अभियानाअंतर्गत कार्यालयीन सुधारणांसह विविध डिजिटल व नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवून प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता यामध्ये विशेष कामगिरी केल्याने जिल्हा परिषद प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान झाले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या Grievances Redressal App द्वारे ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे ऑनलाईन आणि त्वरित निराकरण शक्य झाले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने वापरात नसलेल्या जुन्या 17 वाहनांचे निर्लेखन करण्यात आले यातून ४ लक्ष ५८ हजार ५०० रुपये जिल्हा परिषदेस प्राप्त झाले. जिल्हा परिषद सेवेत असताना मृत झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वारसांसाठी अनुकंपा तत्वावर नोकरीचा लाभ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने अनुकंपा app तयार करण्यात आले आहे यामुळे दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नसून अनुकंपा अर्ज ते नियुक्ती पर्यंतचा प्रवास गतिमान झाला आहे. ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विकसित इ पशु app ची निर्मिती करण्यात आली असून पशुवैद्यकीय दवाखान्यांचे कामकाज यामुळे पेपरलेस झाले आहे.
पेसा ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक कारभार सुनिश्चित करण्यासाठी पेसा App विकसित करण्यात आले असून, याद्वारे गावपातळीवर चालणाऱ्या कामांवर नियंत्रण ठेवण्यात आणि गुणवत्ता तपासणीचे काम शक्य होत आहे. Intelligent Work Management System (IWMS) या प्रणालीमुळे जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांमध्ये गती आणि पारदर्शकता आली आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढली आहे. केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन निर्धारित उद्दिष्टे गाठण्यात नाशिक जिल्हा परिषदेला यश आले आहे. अंगणवाडी केंद्रांचे 100% विद्युतीकरण पूर्ण करून त्या केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. CSR (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवून विकासप्रक्रियेत समाजाचा थेट सहभागास चालना देण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकांशी सुसंवाद मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.