नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाण्याच्या टंचाईमुळे वणवण भटकावे लागत असल्याने संतप्त महिलांनी हंडे घेऊन नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ठाण मांडले आहे. या आंदोलनामुळे नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याने महिलांचा संयम सुटला आहे. त्यामुळेच त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक शहरालगत तिरडशेत हे गाव आहे. त्र्यंबक रस्त्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावात मात्र पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना मोठी पायपीट करावी लागत आहे. दिवसभर मोलमजुरी करायची आणि पाण्यासाठी हंडे घेऊन कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणायचे हाच दिनक्रम दररोज सुरू आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार केली, मागणी केली तरी काहीही परिणाम झाला नाही. अखेर आज सकाळी गावातील महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी हातात हंडे घेऊन थेट नाशिक-त्र्यंबक रस्ता गाठला. या महिलांनी आता रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाने याची दखल घेतली असून अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळ गाठले असून आंदोलक महिलांशी त्यांनी संवाद सुरू केला आहे.