नाशिक – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केल्यानुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने 2019 ते 2021 या तीन वर्षात विशेष संक्षिप्त कार्यक्रम अंतर्गत 80 हजार 605 दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली असून ऑक्टोबर 2020 मध्ये दुबार व अनेकाविध मतदारांची एकूण 73 हजार 650 ने कमी होऊन आज केवळ 60 इतकी शिल्लक आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, मागील तीन वर्षातील विशेष संक्षिप्त कार्यक्रम अंतर्गत मयत 16 हजार 704, स्थलांतरीत 48 हजार 024 व दुबार 15 हजार 877 अशी एकूण 80 हजार 605 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच मतदारयादी शुद्धीकरण कार्यक्रमास प्राधान्य देवून जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना दुबार मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत तात्काळ पडताळणी व वैधानिक प्रक्रियेचे पालन करुन दुबार नावे वगळण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मतदारयादी शुद्धीकरणाचे कामकाज मुदतीत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुबार मतदार नोंदणी शोधमोहिम अंतर्गत नोटीस निर्गमित करणेकामी तसेच इतर आवश्यक कामकाजासाठी अतिरीक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा विडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.
येथे तपासून पहा
मतदार यादीतील दुबार नाव नोंदीच्या प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी तालुकास्तरावर व तहसिल कार्यालयात कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीबाबत असलेल्या संकेतस्थळ www.nvsp.in किंवा voter search तसेच आयोगाच्या हेल्पलाईन नंबरवरून मतदारयादीत आपल्या नावाची दुबार नोंदणी झाली नसल्याची खात्री करून यादीतील दुबार नाव कमी करण्यासाठी नागरिकांनी तहसिल कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी सूरज मांढरे केले आहे.
तसेच सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे मतदार यादीतील नाव दुबार नोंदविले जाणार नाही यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य ती दक्षता घेण्याबाबत सर्व आस्थापनांना कळविण्यात आले आहे. याकरीता अधिनस्त कर्मचारी यांचे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन त्याबाबतचे विभाग प्रमुख तसेच विविध संस्था प्रमुख यांचेकडून प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करणेबाबतही निर्देशीत करणेत आले असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.
समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक
विभाग, संस्था प्रमुख यांचेकडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि महानगरपालिका शिक्षणाधिकारी यांची समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सर्व औद्योगिक संस्था व आस्थापनांसाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, सर्व प्रकारच्या बांधकाम संबंधित आस्थापना व संस्थासाठी कामगार सहायक आयुक्त आणि इतर मोठ्या आस्थापनांसाठी लघु पाटबंधारे भुसंपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांची समन्वयिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
समन्वय अधिकारी यांच्या सनियंत्रणकामी मध्यवर्ती कृतीदल स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी व राष्ट्रीय सूचना व माहिती केंद्र, नाशिक व तहसिलदार (निवडणूक) यांचा समावेश करुन सदर नियंत्रण कक्षामार्फत उपरोक्त कामकाजावर दररोज देखरेख ठेवणेत येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व नागरीक, लोकप्रतिनिधी व प्रशासन सर्वांनी मिळून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नपुर्वक सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.