इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अगदीच मजबुत स्थिती असतांना देखील महाराष्ट्र संघाने बडोद्याविरुध्द सुरू असलेल्या रणजी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी किमान चहापानानंतर का होईना, परंतु आपला दुसरा डाव घोषीत न केल्याने आता सामना जिंकायचा असेल तर शेवटच्या दिवशी बडोद्याचा संपुर्ण संघ बाद करण्याची जादुई कामगिरी महाराष्ट्राच्या गोलंदाजांना करावी लागणार आहे. दिवसअखेर महाराष्ट्राच्या ७ गडी बाद ४६४ धावा झाल्याने आता महाराष्ट्राकडे ६१६ धावांची आघाडी जमा झाली असून उद्या सकाळी जर महाराष्ट्राने डाव घोषीत करून बडोद्याला संधी दिली तर शेवटच्या दिवशी विजयासाठी ६१६ धावांचे एैतिहासीक आव्हान बडोद्याला पेलावे लागेल किंवा आयतीच संधी मिळाल्याने एका गुणाच्या कमाई साठी हा सामना अनिर्णीत कसा राखता येईल? यासाठी प्रयत्न करावे लागतील.
पहिल्या डावाप्रमाणेच जर महाराष्ट्राच्या गोलंदाजीसमोर बडोद्याची पडझड झाली आणि दिवसभरात महाराष्ट्राला संपुर्ण बडोद्याचा संघ गुंडाळण्यात यश आले तर यावर्षी रणजी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत गटामध्ये गुणांच्या तालिकेत आघाडीवर असलेल्या बडोद्याला स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावे लागेल असे एकंदर चित्र तयार झाले आहे.
दुसऱ्या दिवसाप्रमाणेच आज तिसऱ्या दिवशी देखील महाराष्ट्राच्या संघाची सामन्यावरची पकड मजबुत होती आणि त्याचे शिल्पकार होते ते म्हणजे शतकवीर सौरभ नवले, केवळ एका धावेने आपल्या घरच्या मैदानावर ज्याचे शतक हुकल्याने नाशिककर हळहळले अस नाशिकचा रामकृष्ण घोष
आणि कर्णधार ॠतुराज गायकवाड. या तिघांसमोर कृणाल पंड्या आणि त्याचे एकूण १० गोलंदाज साफ अपयशी ठरले. मितेश पटेल हा बडोद्याचा यष्टीरक्षक वगळता उरलेल्या १० खेळाडूंना पंड्याने आज गोलंदाज म्हणून आजमावून बघितले. विष्णू सोळंकी आणि शाश्वत पटेल या दोघांचा उल्लेख संघाच्या अधिकृत यादीत फक्त फलंदाज असा करण्यात आलेला आहे. परंतु, आज या दोघांनी मिळून लगभग १२ षटके गोलंदाजी टाकून बघितली. नाशिकच्या खेळपट्टीसोबत दोस्ती जुळलेल्या महाराष्ट्राच्या फलंदाजानी मात्र या सर्वापुढे हार मानलीच नाही आणि दिवसअखेर ७ गडी बाद ४६४ या धावसंख्येवर महाराष्ट्राचा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला.
सिध्दार्थ नवले हा यष्टीरक्षक फलंदाज पहिल्या डावात ८३ धावा काढून बाद झाला होता. शतक हुकल्याने झालेली निराशा सौरभने दुसऱ्या डावात पुर्णपणे भरून काढली. १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने तो दिवसअखेर १२६ धावांवर नाबाद राहून परतला. नाशिकचा लाडका खेळाडू रामकृष्ण घोष याचे शतक मात्र अवघ्या एका धावेने हुकल्याने मैदानावर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. विष्णु सोळंकीकडून त्याच्या यष्टी उडण्यापुर्वी त्याने १५ चौकारांच्या सहाय्याने १३४ चेंडून ९९ धावा केल्या. पहिल्या सत्रात कर्णधार ॠतुराज गायकवाडने धावफलक सतत हलता ठेवत अवघ्या ८३ चेंडूत ८९ धावा केल्या. अमित शेठच्या गोलंदाजीवर तो यष्टीरक्षक मितेश पटेलकडे झेल देवून परतला.
शनिवारी मैदानावरच्या खेळपट्टीतून फटका मारताना धूळ उडताना दिसत होती. तिसऱ्या दिवशी हळूहळू ही खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल वाटावी असे चित्र जाणवत होते. परंतु बडोद्याच्या फिरकी गोलंदाजाना याचा फायदा उचलता आला नाही. आता उद्या सामन्याचा शेवटचा दिवस असून मजबुत स्थितीत असलेला महाराष्ट्राचा संघ फिरकीच्या जोरावर सामना जिंकतो की सामना वाचविण्यात बडोद्याचे फलंदाज यशस्वी होतात हे सामन्याच्या शेवटच्या दिवशीच समजेल.