जगदीश देवरे, नाशिक
काल मुंबईत झालेल्या एका रणजी सामन्यात फारशा तुल्यबळ नसलेल्या जम्मू काश्मीर संघाने दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबईचा दणदणीत पराभव केला होता. आज मात्र नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाने सामन्याच्या चवथ्या दिवशी बडोद्याचा ४३९ धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्या डावात ८३ धावा, दुसऱ्या डावात नाबाद १२६ धावा आणि याशिवाय संपुर्ण सामन्यात यष्टीमागे ५ झेल, या चौफेर योगदानासाठी सौरभ नवले या यष्टीरक्षक-फंलदाजाला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दोन्ही डावात बडोद्याने ढिसाळ कामगिरी केल्यामुळे त्यांना या सामन्यात २०० धावांचा टप्पा देखील गाठता आला नाही, आणि हेच त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. कालच्या ७ बाद ४६४ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यासाठी महाराष्ट्राचा संघ मैदानात उतरलाच नाही. त्यांनी अपेक्षेप्रमाणे डाव घोषित करून बडोद्याला फलंदाजीची संधी दिली. महाराष्ट्र संघाकडे ६०० धावांची आघाडी असल्याने त्यांना पराभवाची भिती नव्हतीच. दुसरीकडे, बडोद्याच्या संघात कृणाल पांड्या या नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडूचा समावेश संघात असल्यामुळे हा संघ दिवसभर खेळून सामना अनिर्णीत अवस्थेत संपवण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता वाटत होती. परंतु रजनीश गुरबानी आणि मुकेश चौधरी या दोन डाव्या-उजव्या मध्यमगती गोलंदाजांसमोर बडोद्याचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
खेळपट्टीवर बडोद्याच्या एकाही फंलदाजाचा टिकाव लागला नाही आणि शेवटच्या दिवसात जवळपास अर्ध्या दिवसाचा खेळ बाकी असताना अवघ्या १७७ धावात हा संघ गुंडाळला गेला. पहिल्या डावात एकही बळी न मिळवता आलेल्या रजनीश लिंबानी याने ३ बळी तर नाशिकचा लोकल बॉय रामकृष्ण घोष यांने २ बळी घेतले महाराष्ट्राच्या मुकेश चौधरी ने १३ षटकात ५ बळी घेतले.
गेले चार दिवस नाशिककरांनी या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला. या मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत प्रेक्षकांना बसण्यासाठी कुठलीही खास व्यवस्था नव्हती, परंतु तरी देखील मिळेल त्या जागेवर उभे राहून प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत होते. प्रत्येक चौकार षटकारानंतर, खास करून महाराष्ट्राच्या संघाला जोरदार पाठिंबा देण्याचे काम या प्रेक्षकांनी केले आणि महाराष्ट्राच्या संघाने देखील त्यांना विजयाची मेजवानी दिल्याने मैदानातले प्रेक्षक सुखावलेले होते. महाराष्ट्राच्या संघातील ऋतुराज गायकवाड आणि बडोद्याच्या संघातील कृणाल पांड्या हे दोन खेळाडू खास करून नाशिकच्या युवा वर्गासाठी एक प्रमुख आकर्षण होते आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी चढाओढ दिसून आली. शनिवार रविवार सुट्टी असल्याने क्रिकेटची नुकतीच आवड निर्माण झालेल्या बाळ गोपाळांना घेऊन त्यांचे आई-वडील हा सामना बघण्यासाठी घेऊन आल्याचे चित्र देखील या सामन्यात दिसून आले