नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गुजरात, राजस्थान व हरियाणा राज्यांना जाण्यासाठी नाशिकहून थेट रेल्वे सुरु करण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पुढाकारातून लवकरच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्यात येणार आहे. गुजरात, राजस्थान व हरियाणा प्रवासी संघटनांची नुकतीच द्वारका येथील कार्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी याबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीस नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी यांच्यासह गुजरात, राजस्थान व हरियाणा प्रवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक ते गुजरात, राजस्थान व हरियाणा या राज्यांसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील तसेच बाहेरगावी स्थलांतरित झालेल्या प्रवासी समाजाच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर या मार्गावर प्रवासाची गरज असून सध्या थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या विषयावर सर्व उपस्थितांनी एकमताने ठराव करत पुढील काळात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन नाशिक–गुजरात–राजस्थान–हरियाणा मार्गासाठी थेट रेल्वेगाडी सुरू करण्याचे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी व प्रवासी संघाचे पदाधिकारी लवकरच प्रतिनिधी मंडळासह नवी दिल्ली येथे भेट देऊन ही मागणी रेल्वे मंत्रालयाकडे मांडणार आहेत.
यावेळी जर नाशिक ते उत्तर भारत या राज्यांदरम्यान थेट रेल्वे सुरू झाली तर हजारो प्रवासी नागरिकांना दिलासा मिळेल. यामुळे नाशिक व गुजरात–राजस्थान–हरियाणा या राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक संबंधांना चालना मिळेल अशा भावना प्रवासी संघटनांनी व्यक्त केल्या आहे.