नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- युनायटेड वी स्टँड फाऊंडेशन, गेटवे ताज नाशिक आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नंदिनी नदी परिसरात भव्य वृक्षलागवड उपक्रम पार पडला. या उपक्रमाअंतर्गत १००० बांबूचे वृक्ष तसेच १००० इतर प्रजातींची लागवड करून नदीकिनारी हरित कुंपण उभारण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला. यामुळे नदीकाठाचे क्षरण थांबविणे, पाण्याची धूप रोखणे आणि परिसरातील हरित आच्छादन वाढवणे शक्य होणार आहे.
या उपक्रमात नाशिक महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, उद्यान निरीक्षक सचिन देवरे, गेटवे ताज चे आशा सुवर्णा मॅडम , युनाइटेड व्ही स्टॅंड फाउंडेशन चे अध्यक्ष श्री सागर मटाले,तसेच मान्यवरांमध्ये अशोक बिरादार (मीराई योग एल.एल. पी), तेजश्री परांजपे (नाशिक प्लॉगर्स), प्रणम्या ठाकूर (नाशिक थ्रिलर), डॉ. एन. जी. निकम (गुरु गोविंदसिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग), अमित कुलकर्णी (निसर्ग सेवा युवामंच), सचिन जाधव (स्टुडंट पोलीस कॅडेट), आदेश करपे (कर्मयोगी अकॅडमी), रोहित खैरनार (फॉर्म अँड फ्लो फिटनेस), शुभम गोरे (सपकाळ नॉलेज हब) आणि धर्मेश पंचाल (युनायटेड रॉकर क्लब) यांचा उल्लेखनीय सहभाग होता त्या बरोबरच युनायटेड वी स्टँड फाऊंडेशनच्या सदस्यांनी देखिल सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि वृक्षलागवडीनंतर गेटवे ताज नाशिकतर्फे अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यावरणाबद्दल जनजागृती, वृक्षांचे संवर्धन आणि त्यांची देखभाल यावरही चर्चा झाली. आयोजकांच्या मते, अशा उपक्रमांमुळे नंदिनी नदी परिसरातील पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होईल, जैवविविधतेला चालना मिळेल आणि शहरात हरित क्रांती घडवून आणण्यास हातभार लागेल.
नाशिकचे वातावरण वर्षानुवर्षे असेच रहावं यासाठी हा उपक्रम
नाशिक शहराला ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते परंतु आजच्या काळात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे हरित पट्ट्यांची कमी जाणवू लागली आहे. परिणामी हवामान बदल, तापमान वाढ, पावसाच्या पद्धतीत होणारे बदल आणि प्रदूषणाची पातळी वाढणे हे प्रश्न गंभीर होत आहेत. वृक्षलागवड ही केवळ पर्यावरणपूरक कृती नसून, पुढच्या पिढ्यांसाठी आरोग्यदायी व शाश्वत भविष्याचा पाया आहे. वृक्ष मातीला धूपापासून वाचवतात, हवेतील प्रदूषण कमी करतात, पावसाचे पाणी साठवून भूजलपातळी वाढवतात आणि जैवविविधतेला सुरक्षित आसरा देतात. नाशिक येत्या काळातही सगळ्यांना मायेची उब देतं राहावं आणि पर्यावरण बदलांमुळे नाशिक चे एकूण वातावरण वर्षानुवर्षे असेच रहावं या साठी अशा उपक्रमांचा समावेश गरजेचा आहे.
सागर मटाले, अध्यक्ष, युनायटेड वी स्टॅण्ड फाउंडेशन