नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्रामीण भागातील जनतेस प्रभावी, सहज साध्य व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविले जाते. या अभियांतर्गत आरोग्य विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरीकांना उत्तम आरोग्य सुविधा प्राप्त करून द्याव्यात, असे निर्देश केंद्रीय आयुष मंत्रालय व स्वास्थ आणि कल्याण मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी येथे केले.
आज शासकीय विश्रामगृह, नाशिक येथील सभागृहात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री श्री. जाधव बोलत होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान मुंबई येथील अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नाशिकचे उपअभियंता भुषण देसले, बुलढाणा येथील उप अभियंता अभिषेक जवकार उपस्थित होते.
केंद्रीय आयुष मंत्रालय व स्वास्थ आणि कल्याण मंत्री श्री. जाधव यांनी यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान, पीएम- आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (PM- ABHI), आयुष योजना, 15 वा वित्त आयोग याअंतर्गत करण्यात आलेली कामे, प्रस्तावित कामे व प्रलंबित असलेली कामे यांचा आढावा घेतला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रम अंमलबजावणी योजनेत मंजूर असलेल्या कामांची वर्षनिहाय प्राधान्यक्रमानुसार यादी सादर करावी, अशा सूचना मंत्री श्री. जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रांची बांधकाम करतांना काम गुणवत्तापूर्वक व उत्तम दर्जाची होतील याकडे प्रामुख्याने भर द्यावा. 15 वा वित्त आयोग अंतर्गत आरोग्य विषयक विविध चाचण्या करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळा या पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात. तसेच राज्यात ज्या ठिकाणी आरोग्य विषयक सेवा देणारी दवाखाने व प्रयोगशाळा इमारतींची कामे सुरू आहेत, त्यांची अंदाजपत्रकासह नमूद केलेल्या बाबींसह तपासणी करण्यात येणार असल्याचेही केंद्रीय मंत्री श्री. जाधव यांनी सांगितले.