नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दीष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त ५२,७०५ सौर पंप बसविण्याचे उद्दीष्ट महावितरणने साठ दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शंभर दिवसात म्हणजे दि. १६ मार्च २०२५ पर्यंत विविध विभागांसाठी उद्दीष्टे निश्चित करण्यात आली आहेत. महावितरणने या कालावधीत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत एकूण दीड लाख पंप बसविण्याचा टप्पा गाठण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. दि. ६ डिसेंबर रोजी ९७,२९५ सौर कृषी पंप बसविण्यात आले होते. त्यानंतर दि. ४ फेब्रुवारीपर्यंत महावितरणने ५३,००९ सौर कृषी पंप बसविले. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत आतापर्यंत बसविलेल्या पंपांची संख्या १,५०,३०४ झाली आहे. यामध्ये नाशिक परिमंडळात २२ हजार ५०९ सौरपंप बसविण्यात आली आहेतमहावितरणला शंभर दिवसात ५२,७०५ पंप बसवायचे उद्दीष्ट होते पण साठ दिवसात ५३,००९ सौर पंप बसविण्यात आले.
राज्यात ४ फेब्रुवारी अखेर बसविलेल्या १,५०,३०४ सौर कृषी पंपांमध्ये जालना (१८,४९४ पंप), बीड (१७,९४४), अहिल्यानगर (१३,३६६), परभणी (११,७५५), संभाजीनगर (९,३२९), नाशिक (९,१४३), हिंगोली (८,५३८), धाराशीव (६७६५) आणि जळगाव (६६४८) या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप या राज्य सरकारच्या योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के आणि राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे सौर पॅनेल्स, कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के असून त्यांना ९५ टक्के अनुदान मिळते.
सौर कृषी पंप बसविल्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने त्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होते. हे पंप वीजजाळ्यावर अवलंबून नसल्याने शेतकरी दिवसा हव्या त्या वेळेला सिंचन करू शकतो. सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ कृषी पंपासाठी वीजबिलातून मुक्तता होते. सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते.
सौर कृषी पंप बसविण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षभरात या मोहिमेला विशेष गती आली आहे. राज्यात २०१५ पासून नऊ वर्षात महावितरणने १,०६,६१६ सौर कृषी पंप विविध योजनांच्या अंतर्गत बसविले होते. तथापि, जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत दीड लाख पंप बसविले आहेत.