नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अक्षयतृतीया मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद नाशिकमार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अक्षयतृतीया हा शुभ मुहूर्त मानला जात असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच बालविवाहाबाबत कोणतीही माहिती असल्यास शासकीय यंत्रणेस तात्काळ कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सर्व गटविकास अधिकारी यांची दुरदृश्य प्रणालीद्वारे व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेऊन बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह होणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार बालविवाह हा अजामीनपात्र गुन्हा असून, या कायद्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह होणार नाही, यासाठी सन्माननीय सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन जनजागृती करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केल्या आहेत.
अक्षयतृतीया कालावधीत कोणताही बालविवाह घडू नये यासाठी ग्रामस्तरावर दक्षता समित्या सक्रिय करण्यात येणार आहेत तसेच जर कोणत्याही गावात बालविवाह होण्याची शक्यता असेल, तर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यवाहीचा तपशीलवार अहवाल प्रत्येक गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद कार्यालयास सादर करावा असेही निर्देश देण्यात आले आहेत.
बालविवाह रोखणे ही सामाजिक जबाबदारी
जिल्हयात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह घडू नयेत यासाठी जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या जवळपास कोणत्याही स्वरूपाचा बालविवाह होत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, तसेच शासनाच्या १०९८ या क्रमांकावर माहिती द्यावी. बालकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने बालविवाह रोखणे ही सामाजिक व प्रशासकीय जबाबदारी असून जिल्हयातील सर्व नागरिकांनी यासाठी मदत करावी.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नाशिक