नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुन्या वादाची कुरापत काढून मित्रांच्या टोळक्यानेच तरूणाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुटुंबियांच्या आरोप आणि शवविच्छेदन अहवालानंतर याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय निकम, रोशन कडाळे, रोशन कुसाळकर, सोनु ऊर्फ प्रतीक गायकवाड, बबल्या उर्फ निर्माण पवार (रा. सर्व कस्तुरबानगर) अशी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहे. होलाराम कॉलनीतील कस्तुरबानगर भागात राहणा-या शानू सैदाप्पा वाघमारे (२५) हा तरूण मंगळवारी (दि.२) पहाटेच्या सुमारास राजीव गांधी भवन जवळील बाफना ज्वेलर्सच्या बाजूला जखमी अवस्थेत मिळून आला होता. बेशुध्द अवस्थेत भाऊ परशुराम वाघमारे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.
शानू वाघमारे याच्या छातीस व पायास गंभीर दुखापत झालेली असल्याने त्याचा घातपात झाल्याचा दावा कुटुंबियानी केला होता. आरोपींना अटक करण्याची मागणी करीत बुधवारी कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने सायंकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून शोध मोहिम राबवित संशयितांना ताब्यात घेतले असून मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास टिळकवाडी सिग्नल भागात दुचाकीने आलेल्या युवकांमध्ये शाब्दिक वाद झाले. यावेळी मित्रांनी राजू ऊर्फ शानू वाघमारे यास ढकलून दिल्याने तो जमिनीवर कोसळून मृत्युमुखी पडल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे सुत्रांनी सांगितले. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.