नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना गोदाघाटावर घडली. या घटनेत डोक्यात धारदार वस्तू मारण्यात आल्याने रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार पुरूषोत्तम बलक (३७ रा.ठाकरे मळा, गुंजाळबाबानगर) या रिक्षाचालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. बलक मंगळवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास रामकुंड भागातील पांडे मिठाई येथील रिक्षा थांब्यावर आपले वाहन पार्क करून प्रवाश्यांची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली.
एमएच १५ एचक्यू ८२५२ या चारचाकी वाहन चालकास त्याने रिक्षाथांबा परिसरात वाहन लावण्यास मज्जाव केल्याने हा वाद झाला. संशयित चालकाने अन्य दोघांना बोलावून घेत रिक्षाचालक बलक यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत एकाने बलक यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.