नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्वस्त धान्य दुकानदाराने गोरगरीबांच्या रेशनवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात हा प्रकार समोर आला असून शिधापत्रीकाधारकांना वाटप करण्यात येणा-या गहू व तांदूळ असा ८४ क्विंटल धान्य परस्पर हडप करण्यात आले आहे. हा प्रकार चौकमंडईतील स्वस्त धान्य दुकान क्र.६९ मध्ये घडला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल दिगंबर सदावर्ते (रा.रंगूबाई जुन्नरे शाळेजवळ, द्वारका) व मुकूंद सुभाष पाटकर (रा.शिवाजीनगर,फेम सिनेमा समोर गांधीनगर) अशी धान्याचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विलास कनोजे यांनी फिर्याद दिली आहे. कनोजे पुरवठा विभागात कार्यरत असून त्यांना दुकान क्र.६९ बाबत मोठ्या संख्यने तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शिधापत्रीकाधारकांना देण्यात येणारा नियमीत आणि मोफत शिधा वाटपात हा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्राहकाना नियमीत वाटपात टोलवाटोलवी करणे तसेच वेळोवेळी दुकान बंद ठेवणे आदी तक्रारी प्राप्त झाल्याने पुरावठा विभागाने छापा टाकून दप्तर तपासणी केली असता त्यात शिधापत्रीकाधारकांना शासनाच्या योजनेनुसार वितरीत करण्यासाठी देण्यात आलेल्या धान्यापैकी गहू, तांदूळ व अन्य असे ८३ क्विंटल ४० हजार किलो धान्याचा अपहार करण्यात आल्याचे समोर आले. शासन आणि शिधापत्रीकाधारकांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास येताच पुरवठा विभागाच्या वतीने पोलीसात धाव घेण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.